अहमदनगर : ‘इतिहास चुकीचा दाखवला’ हा वाद चित्रपटांसाठी नवीन नाही. परंतु आता नाटकांमध्ये देखील इतिहासावरून वाद सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. ६१ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेदरम्यान एका नाटकाच्या प्रयोगावेळी गोधळ झाल्याचे समोर आले. नाटकातील भागांवर आक्षेप घेत काही जणांनी यावेळी नाट्यगृहात गोंधळ घातला.
गोंधळामुळे नाट्यगृहात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.राज्य नाट्य स्पर्धेत ‘मी पण नथुराम गोडसेच बोलतोय’ या नाटकाचे सादरीकरण सुरु होते. यावेळी नाटकावर आक्षेप घेत काहींनी जोरदार घोषणाबाजी केली. या नाटकातून वीर सावरकरांची चुकीची प्रतिमा दाखवली जात असल्याचा आरोप सावरकर प्रेमींनी केला आहे.
उत्कर्ष गीते आणि अमोल हुबे पाटील या सावरकर प्रेमींनी याबाबत आपली भूमिका देखील स्पष्ट केली. तसेच या नाटकाचे प्रयोग राज्यात कोठेही होऊ देणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर देखील हा प्रकार घालणार असलयाचे सावकार प्रेमींनी यावेळी म्हंटले.