लाहोर :- भारत व पाकिस्तान यांच्या सामन्यांत पूर्वी दिसत होती तशी रंगत व खुन्नस आता दिसत नाही, असे मत भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले होते. त्यावर पाकिस्तानचा माजी कसोटीपटू बासीत अलीने असहमती दर्शवली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघातील खेळाडूंप्रमाणे आता गांगुलीही माइंड गेम खेळायला लागला असल्याचा शेराही त्याने मारला.
भारत व पाकिस्तान हे परंपरागत प्रतिस्पर्धी संघ पूर्वीसारखे सामन्यात रंगत निर्माण करताना दिसत नाहीत. त्यांचे बहुतांशी सामने एकतर्फीच होताना दिसतात, असे गांगुली म्हणाला होता. मात्र, बासीत अलीने त्याचे मत खोडून काढले आहे.
तो म्हणाला, गांगुली भारतीय संघाचा कर्णधार होता, तसेच बीसीसीआयचा अध्यक्षही होता या संपूर्ण वाटचालीत त्याने अनेकदा भारत व पाकिस्तान यांच्यातील सामन्यांचा थरारही अनुभवला आहे व पाहिलाही आहे. भारत व पाकमधीलच नव्हे तर हा सामना सुरू झाल्यावर क्रिकेट खेळत असलेल्या देशांतील रस्तेही रिकामे होतात. चाहत्यांसाठी या दोन संघातील सामना म्हणजे पर्वणी असते.
उलट गेल्या काही वर्षांपासून या दोन संघातील द्विपक्षीय मालिका बंद झालेल्या असताना असे आयसीसी किंवा आशिया करंडकात होत असलेल्या सामन्यांची चुरस जास्तच वाढते. यंदाही आशिया करंडक तसेच विश्वकरंडक होत आहे, त्यात गांगुली कसा चुकीचा आहे ते समोर येईलच.
यंदा आयसीसी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा भारतातच होणार आहे. 5 ऑक्टोबरपासून सुरू होणारी ही स्पर्धा 19 नोव्हेंबरपर्यंत चालेल. त्यात 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे, त्यात जबरदस्त रंगत असेल, असे मतही बासीत अलीने व्यक्त केले आहे.