India vs Pakistan, ICC Under 19 World Cup 2024 : अंडर-19 विश्वचषक 2024 आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. भारतीय क्रिकेट संघाने अपराजित राहून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता या स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जाऊ शकतो. असे झाले तर 18 वर्षांनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात विजेतेपदासाठी सामना पाहायला मिळेल.
पहिल्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रोमहर्षक सामना जिंकला. भारतीय अंडर-19 संघाने आता अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. जर पाकिस्तान संघाने हा सामना जिंकला तर अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठी लढत होऊ शकते.
भारताचा 9व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश…
अंडर-19 विश्वचषक 2024 चा पहिला उपांत्य सामना बेनोनी येथील विलोमूर पार्क येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. प्रथम खेळताना दक्षिण आफ्रिका अंडर-19 संघाने 50 षटकांत सात गडी गमावून 244 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना भारतीय अंडर-19 संघाने एकेकाळी अवघ्या 32 धावांत चार महत्त्वाचे विकेट गमावले. मात्र, यानंतर कर्णधार उदय सहारन (81 धावा) आणि सचिन दास (96 धावा) यांनी पाचव्या विकेटसाठी 171 धावांची भागीदारी करत सामन्याला कलाटणी दिली. अखेरीस, टीम इंडियाने उपांत्य फेरीचा सामना 2 गडी राखून जिंकला आणि 9व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला.
भारताने एकूण नववेळा अंडर-19 विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. भारताला सलग 5व्यांदा अंतिम फेरीचे तिकीट मिळाले आहे. याआधी भारताने 2016, 2018, 2020 आणि 2022 मध्ये अंतिम फेरी गाठली आहे. भारत पाच वेळा चॅम्पियन बनला असून तीनदा फायनलमध्ये पराभूत झाला आहे.
11 फेब्रुवारीला होणार अंतिम सामना…
अंडर-19 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना 11 फेब्रुवारीला होणार आहे. याआधी 8 फेब्रुवारीला या स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. भारताप्रमाणेच पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाही स्पर्धेत अजिंक्य ठरले आहेत. पाकिस्तानने सर्व सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाचा शेवटचा सामना रद्द झाला. जर पाकिस्तान संघाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर 11 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना खेळवला जाईल.
#U19WorldCup2024 : रोमांचक सामन्यात ‘टीम इंडिया’चा विजय, आफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरीत मारली धडक…
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 18 वर्षांनंतर फायनल…
2006 मध्ये अंडर-19 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात झाला होता. कमी धावसंख्येचा हा सामना पाकिस्तानने जिंकला होता. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा संघ केवळ 109 धावांत गारद झाला. मात्र, यानंतर त्याने भारतीय संघाला केवळ 71 धावाच करू दिल्या. अशा परिस्थितीत जर यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल झाली तर टीम इंडियाला नक्कीच 18 वर्ष जुन्या पराभवाचा बदला घेईल आणि विजेतेपद पटकावेल.