पुरोगामी विचारांचा वारसा असणाऱ्या उबाळे घराण्याच्या स्नुषा तृप्ती रमेश उबाळे यांची संघर्ष कथा प्रेरणादायी आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळवित तृप्तीताईंनी उबाळे कुटुंबीयांना आनंद दिला. संकटांवर मात करीत आयुष्यात यशस्वी होण्याचा मूलमंत्र त्यांनी नव्या पिढीपुढे ठेवला.
आयुष्यात काही करायचे असेल तर जिद्दीला कष्टाची जोड हवी. स्वतःला सिध्द करण्यासाठी अविरत कष्टाची तयारी, काळाची पावले ओळखून योग्य निर्णय घेण्याची समयसूचकता हवी. ल्हासुर्णे (ता. कोरेगाव) येथील पुरोगामी विचारांचा वारसा असणाऱ्या उबाळे घराण्याच्या स्नुषा तृप्ती रमेश उबाळे यांची संघर्ष कथा निश्चित प्रेरणादायी आहे. बांधकाम व्यावसायिक असणारे पती रमेश उबाळे यांनी अवघ्या दीडशे रुपयाच्या भांडवलावर कारकीर्दीची सुरवात केली.
तेव्हा त्यांच्यातील समजूतदारपणा आणि समाजासाठी झोकून काम करण्याची प्रवृत्ती हे पाहून तृप्ती यांनी आपला सखासोबती हाच म्हणत त्यांच्याशी लग्नगाठ बांधली. ते दिवस खूप आनंदाचे असले तरी प्रत्येक दिवस खडतर आव्हानांचा होता. तृप्तीताई आपल्या संघर्षाच्या दिवसांचा पट उलगडत होत्या. पती रमेश उबाळे यांचे आजोबा नवलोबा उबाळे हे सावकार नावाने ओळखले जात. स्वातंत्र्यचळवळीतील सहभागामुळे उबाळे घराण्याला सुधारणावादी विचारांचा वारसा व वेगळे वलय आहे. रमेश उबाळे यांच्याशी 17 वर्षापूर्वी विवाह झाल्यावर तृप्ती यांनी अनेक छोट्या मोठया खासगी नोकऱ्या केल्या. पगार पुरत नव्हता.
पण वेळ निभावून ध्येय गाठायचे होते. त्यातून जिद्दीने त्यांनी स्टेनो टायपिंगचा कोर्स (लघुलेखन) पूर्ण केला. तृप्ती यांचे मामा प्रदीप बडवे यांचे फार मोठे सहकार्य व मार्गदर्शन त्यांना लाभले. तृप्ती यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा द्याव्यात, ही त्यांची इच्छा होती. रमेश व तृप्ती यांच्या संसारवेलीवर ऋग्वेद नावाचे फूल उमलले होते. संसाराच्या गरजासुध्दा वाढल्या होत्या. तशाही परिस्थितीत खासगी नोकरी, ऋग्वेदचे संगोपन, स्पर्धा परीक्षेची तयारी अशी त्रिस्थळी यात्रा तृप्तीताईनी मोठ्या हिमतीने पार पडली. सतत चार वर्षे स्पर्धा परीक्षेची कठोर मेहनत, ग्रुप डिस्कशन, अंतिम निवड यादीचा तणाव या कठीण टप्प्यांतून तृप्तीताई गेल्या.
मात्र, 2012 मध्ये त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन मुंबईत पोलीस खात्याचे विशेष महासंचालक यांच्या विशेष सहाय्यक म्हणून त्यांची निवड झाली. मुंबईतील नोकरीचा पहिला दिवस मी कधीच विसरणार नाही, असे तृप्तीताई सांगत होत्या. यजमान रमेश मला सोडायला आले होते. मुंबईत एकटे राहयचे, या कल्पनेनेच मी अस्वस्थ होते. मात्र पतीचा भक्कम आधार महत्वाचा ठरला, असे त्यांनी सांगितले. भायखळा येथे पोहचण्यासाठी लोकलचा सतत सात वर्ष प्रवास, आयपीएसचे प्रोटोकॉल समजून घेण्याचा केलेला प्रयत्न, प्रत्येक काम समजून घेत जबाबदारीने करण्याची समजदारी यामुळे तृप्ती रमेश उबाळे यांनी अल्पावधीतच आपल्या कामाचा ठसा उमटविला. दर शनिवारी त्या साताऱ्यात येत असतं. तर रमेश उबाळे त्यांना भेटायला मुंबईला जात असतं.
तृप्ती व रमेश यांनी संघर्षाच्या या टप्प्यात एकमेकांना सहजपणे समजून घेतले. रमेश उबाळे यांनीही शून्यातून सुरवात करत बालाजी कन्स्ट्रक्शन ही फर्म प्रचंड कष्टाने नावारूपाला आणली. साताऱ्यातील मोठमोठ्या फर्मची यशस्वी बांधकामे आज बालाजीच्या नावावर जमा आहेत. पतीच्या या कष्टाचा व समाजकारणी वृत्तीचा सार्थ अभिमान त्यांना आहे. तृप्तीताई आज पुणे येथे राज्याच्या बिनतारी संदेश वहन विभागाच्या प्रमुख कार्यालयात वरिष्ठ सहाय्यक म्हणून गेल्या वर्षभरापासून सक्रिय आहेत. ऋग्वेद आता पुढील शिक्षणासाठी पुण्याला रवाना झाला आहे.
सिव्हिल ड्रॉफ्टसमन असणाऱ्या तृप्ती यांनी एकेकाळी स्पर्धा परीक्षांचा नाद सोडून पतीच्या व्यवसायात मदत करायची हे ध्येय निश्चित केले होते. मात्र, नियतीच्या मनात वेगळेच होते, बिनतारी संदेश यंत्रणेचे मजकूर, वरिष्ठ महासंचालकांचा गोपनीयं पत्रव्यवहार, इतर महत्वाचे अहवाल, त्याचे शब्दांकन आणि त्याची शासकीय शैलीची मांडणी या सर्व जवाबदाऱ्या तृप्ती उबाळे अत्यंत लीलया पेलत आहेत.