===
सातारा, दि. 24 (प्रतिनिधी) -साताऱ्यातील 22 मजुरांना पश्चिम बंगालमधील नुधिया जिल्ह्यात पोहचवण्याची जबाबदारी एसटीच्या सातारा आगाराने उचलली. या मजुरांना सुखरूप पोहचवून अनंत अडचणी आणि जीवघेण्या अन्फाम वादळाशी दोन हात करून साताऱ्यातील ‘लालपरी’ बंगालच्या सागराला वेढा मारून परतली. लालपरीच्या या विक्रमी प्रवासाबद्दल सुरेश जगताप आणि संतोष निंबाळकर या दोन्ही चालकांचा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सन्मान केला.
सातारा शहरात लॉकडाऊनमुळे बाहेरच्या राज्यातील मजूर अडकले होते. त्या मजुरांना त्यांच्या गावी पोचवण्यासाठी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार 22 जणांनी पश्चिम बंगालमध्ये नुधिया जिल्ह्यात सोडण्याची विनंती केली. मजुरांच्या मागणीनुसार त्यांना गावी पोहचवण्याची जबाबदारी सातारा आगाराने घेतली. सातारा आगाराने दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आगारचे अधिकारी संजय भोसले, रेश्मा गाडेकर यांनी बस (एमएच 13 ई ओ 8471) आणि अनुभवी चालक एस. टी. जगताप व नवखे चालक एस. एस. निंबाळकर यांची निवड केली.
सलग 50 तास 2300 किलोमीटर प्रवास करत 22 मजुरांना नुधिया जिल्ह्यात सुखरूप पोहचवण्यात आले. हा जिल्हा बांगला देशला जोडून आहे. साताऱ्याकडे परत फिरताना बस आणि दोन्ही चालक खडकपूर येथे अन्फाम वादळात आठ तास अडकले. त्यातूनही सुखरूप बाहेर पडून खूप लांबच्या प्रवासाची आठवण घेऊन ते दोन्ही चालक मजल दरमजल करत दि. 20 रोजी मायभूमीत पोहचले.
एका दिवसात 900 किलोमीटर अंतर अशी बस चालवत तब्बल चार हजार 600 किलोमीटर अंतर पाच दिवसांत कापण्याचा विक्रम लालपरीने या दोन्ही चालकांच्या साह्याने केला. डिझेल टाकण्यासाठी आणि चेक पोस्टवर तपासण्या करण्यासाठी थांबले जात होते. तेथेच जेवण खाणे होत होते. सातारा आगारातील लालपरीने एवढ्या लांबचा पल्ला गाठण्याची ही महामंडळाच्या इतिहासातील पहिलीच वेळ असून हा विक्रम करणारे चालक जगताप आणि निबाळकर यांची कामगिरी उल्लेखनीय आहे, अशा शब्दात शिवेंद्रसिंहराजे यांनी दोघांचे कौतुक केले.