मसूर – धरणांतील पाणी नदीपात्रात सोडण्याबाबत राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या स्वाक्षरीचे पत्र शिष्टमंडळाने ग्रामस्थांसमवेत जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केले. या पत्रात बाळासाहेब पाटील यांनी म्हटले आहे की, कराड- उत्तर विधानसभा मतदारसंघातील सुमारे 55 ते 60 गावे नदीकाठी असून या सर्व गावांना पिण्याच्या पाण्याची सोय कृष्णा, तारळी, उरमोडी, उत्तर मांड नदीतून आहे. सध्या या सर्व नद्यांतील पाण्याची पातळी कमी झाल्याने पाणी फार दूषित झाले आहे.
परिणामी पशुधनासह मनुष्यास रोगराई होण्याची शक्यता आहे. ही रोगराई होऊ नये म्हणून नद्या प्रवाहित होण्याकरिता धरणांतून या सर्व नद्यांना पाणी सोडणे गरजेचे आहे. याबाबत सर्व ग्रामपंचायतीनी माझ्याकडे पाणी नदीत सोडण्याकरिता मागणी अर्ज केलेले आहेत. त्याकरिता आपण जलसंपदा विभागास सूचित करून कृष्णा, तारळी, उरमोडी, उत्तर मांड या सर्व नद्यांमध्ये पिण्यासाठी पाणी कायमस्वरूपी सोडण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी पत्रात केली आहे. हे निवेदन देताना जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी नद्यांना पाणी सोडणेबाबतची वस्तुस्थिती जिल्हाधिकाऱ्यांकडे विषद केली.
याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव क्षीरसागर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कराड उत्तर अध्यक्ष देवराजदादा पाटील, सौ. संगीता साळुंखे (माई), लालासाहेब पाटील, तानाजीराव साळुंखे, आनंदराव कोरे, पै. संजय थोरात, संजय साळुंखे, सोमनाथ जाधव, शिवाजीराव जाधव, पांडुरंग चव्हाण, अविनाश माने, डी. बी. जाधव, विद्याधर बाजारे, सुरेश कुंभार, दिलीपराव कदम, अधिकराव थोरात, काकासो गायकवाड, संतोष जाधव, रामदास पवार, दिलीपराव निकाळजे, सूर्यवंशी, निरंजन साळुंखे, बी. एम. पाटील, पोपटराव साळुंखे, राहुल साळुंखे, पवन साठे, आप्पासो निकम, सचिन शिंदे, आर. जी. तांबे यांच्यासह विविध गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते.