चऱ्होली – पिंपरी-चिंचवड महापालिकेत दिघी समाविष्ट होऊन कित्येक वर्षांचा कालावधी लोटला आहे. तेव्हा नवनगर विकास प्राधिकरणाने भविष्याचा विचार करून दिघीत तब्बल 37 आरक्षणे आरक्षित केली. मात्र, यामध्ये रोजच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणारा भाजी मंडईचा विषय दुर्लक्षित झाल्याने 37 आरक्षणांपैकी एकही आरक्षण भाजी मंडईसाठी आरक्षित करण्यात आले नाही. त्यामुळे अधिकृत भाजी मंडई झाली नसल्यामुळे भाजीविक्रेते रस्त्याच्याकडेला, पदपथावर व ज्याठिकाणी जागा मिळेल तेथे आपले दुकान थाटताना दिसून येत आहेत. त्यामुळे नागरिकांना हक्काच्या भाजीमंडईची प्रतीक्षा आहे.
भाजी दुकानासाठी हक्काची जागा नसल्याने भाजीविक्रेते रस्त्यावर ठाण मांडून बसलेले असतात. छत्रपती संभाजी महाराज चौकापासून भोसरीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी भाजीची दुकाने, फळांच्या गाड्या लागलेल्या असतात. त्यामुळे परिसराला मंडईचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या परिसराच्या चारही बाजूंचे रहिवासी येथील रस्त्यावर भाजी खरेदीसाठी येणारी ग्राहकांची संख्या मोठी आहे. ग्राहकांच्या संख्येत दिवसेंदिवस जशी भर पडत आहे तशी ती भाजी विक्रेत्यांची संख्या सुद्धा वाढत आहे.
अतिक्रमण करून रस्त्यावर भाजीविक्री करणाऱ्यांवर पालिका अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्यात येते. सततच्या होणाऱ्या अतिक्रमण कारवायांमध्ये मालाचे नुकसान होऊन आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो. भाजी विक्रेत्यांनी जायचे तरी कुठे असा संतप्त सवाल करत प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. गावठाणातील नागरिकांना गल्लोगल्ली फिरणारे फेरीवाले यांच्याकडूनच भाजी खरेदी करावी लागते. मंडईतील बाजारभावापेक्षा दोन पैसे जास्त देऊन भाजी खरेदी करण्याशिवाय नागरिकांकडे पर्याय नाही.
प्रशासनाकडून केवळ अश्वासन
चार हजार लोकसंख्या असलेल्या दिघी बोपखेल प्रभागाची लोकसंख्या चाळीस हजारांच्या घरात जाऊन पोहोचली आहे. यासोबत नागरिकांच्या नागरी गरजा सुद्धा वाढल्या आहेत. भाजी मंडई सारखा महत्त्वाचा विषय भाजी व्यावसायिकांनी वेळोवेळी प्रशासन दरबारी मांडला आहे. मात्र, आश्वासना पलीकडे काहीही हाती लागले नाही. महिलावर्गांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणारा भाजीमंडईचा विषय सोडविण्याबाबत प्रशासनाने ठाम भूमिका घेऊन विषय सोडविण्याची गरज असताना मंडईचा विषय भिजत ठेवला आहे. त्यामुळे दिघीकरांना आश्वासनापलीकडे काही मिळणार का असा सवाल आता स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहेत.
भाजी मंडईला अधिकृत जागा नसल्याने रस्त्यावर दुकाने लावावी लागत आहेत. या दुकानांवर महापालिका प्रशासनाच्या अतिक्रमण विरोधी पथकाची कधी वक्रदृष्टी पडेल ते सांगता येत नाही. त्यामुळे आमचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तरी महापालिका प्रशासनाने आम्हा भाजीविक्रेत्यांसाठी स्वतंत्र मंडईची व्यवस्था करावी.
– भाजी विक्रेता.