जिल्हा परिषद व पोलीस दलाचा पुढाकार; ग्रामस्थांना मिळणार माहिती
सातारा – नैसर्गिक आपत्तीची माहिती ग्रामस्थांना जलदगतीने मिळण्यासाठी जिल्हा परिषद व पोलीस दलाने पुढाकार घेतला आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून, आता गावोगावी ग्रामसुरक्षा यंत्रणा बसवण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्ती घडल्यास या यंत्रणेच्या माध्यमातून ग्रामस्थांना याची माहिती मिळणार असल्याने मनुष्य आणि वित्तहानी टाळण्यास मदत होणार आहे.
गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्ती आल्यास, अनेकदा माहितीअभावी जीवितहानी होते. गावोगावी घडणाऱ्या घटनांबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ असतात. या घटनांची माहिती तात्काळ मिळण्यासाठी शासनाने उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात नागरिकांपर्यंत जलदगतीने माहिती पोहोचवण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा बसवण्यात येणार आहे. ही यंत्रणा आधी पुणे, सोलापूर, अहमदनर, उस्मानाबाद जिल्ह्यात राबवली जात आहे.
दरोड्याची घटना, अपघात, अतिवृष्टी, धरणातून पाणी सोडणे, आगीची घटना, निधन वार्ता, ग्रामसभेच्या सूचना, सर्पदंश, वन्यप्राणी गावात येणे, वाहन चोरी, दहशत माजवणारी टोळी सतत गावात येणे, सार्वजनिक कार्यक्रमांची माहिती, पोलिसांकडून खबरदारीच्या देण्यात येणाऱ्या सूचना, आदी माहिती या यंत्रणेमुळे मोबाइलद्वारे नागरिकांना एकाच वेळी मिळणार आहे. ही यंत्रणा ग्रामस्तरावर सुरू करायची असल्यास कुटुंबामागे 50 रुपये खर्च येणार आहे.
या यंत्रणेचा वापर जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य कर्मचारी आणि ग्रामस्तरावर ग्रामस्थांना एकाच वेळी माहिती देणे सोयीचे होणार आहे. या यंत्रणेचा लाभ घेण्यासाठी ग्रामस्थांनी आपला मोबाइल क्रमांक ग्रामसुरक्षा यंत्रणेकडे आणि टोल फ्री क्रमांक 18002703600 वर नोंदवणेही आवश्यक आहे.
ग्रामीण भागात नैसर्गिक आपत्तीच्या काळात या यंत्रणेचा फायदा होणार असून, वित्त आणि मनुष्यहानी टाळण्यास मदत होणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामस्तरावर सर्व सूचना एकाच वेळी मिळण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे.
ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी