पुणे – यंदाच्या मान्सून हंगामात सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्याला संजीवनी मिळाली आहे. बारामतीवगळता सर्व तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे पिण्याचा पाण्याचा गंभीर झालेला प्रश्न काहीसा सुटल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मागील चार महिन्यांतील पावसाची परिस्थिती पाहता, ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील पहिले दहा दिवस असा तब्बल सव्वा महिना खंड पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यांत पाणीटंचाईची समस्या गंभीर झाली होती. मात्र, सप्टेंबरमधील शेवटच्या पंधरा दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने पुण्यासह राज्याला संजीवनी दिली.
सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत निम्मा पुणे जिल्हा कोरडा होता. आठ ते दहा दिवस झालेल्या मुसळधार पावसाने सर्व तालुक्यांतील पाणी टंचाई दूर केली. सप्टेंबरमध्ये सर्व तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. तर केवळ बारामतीमध्ये सरासरी 80 टक्के पाऊस झाला.
काही तालुक्यांना समाधान
सप्टेंबरमध्ये पुणे जिल्ह्याला पावसाने मागील तीन महिन्यांतील बॅकलॉग भरून काढत सरासरीमध्ये वाढ केली. मात्र, आता परतीचा पाऊसही शांततेत गेल्यामुळे राहिलेला बॅकलॉग कसा भरणार? असा प्रश्न उपस्थित झाला. यंदाच्या पावसाळी हंगामात (दि.1 जून ते 8 ऑक्टोबरपर्यंत) आंबेगाव, भोर, वडगाव मावळ तालुक्यात सरासरीपेक्षा शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला. वेल्हे, जुन्नर, खेड-राजगुरूनगर येथे 90 टक्क्यांपेक्षा अधिक तर पुणे शहर, हवेली, शिरूर, इंदापूर, दौंड तालुक्यात 70 टक्क्यांपेक्षा अधिक आणि अन्य तालुक्यात 50 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.