सातारा – सातारा जिल्ह्यातील शेकडो खेळाडू धनुर्विद्या (आर्चरी) या खेळाचा सराव करत असून, या खेळाचे महत्त्वाचे केंद्र जिल्हा होऊ पहात आहे. जिल्ह्यातील खेळाडूंना सरावासाठी अद्ययावत सुविधा आणि सराव केंद्राची आवश्यकता आहे. या खेळाडूंमध्ये भविष्यात ऑलिम्पिक पदके मिळवून देण्याची क्षमता असल्याने, जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे सराव केंद्र उभारण्याबाबत केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने कार्यवाही करावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे केली.
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्जुन पुरस्कारासाठी धनुर्विद्येत सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेल्या अदिती स्वामी आणि ओजस देवतळे यांची निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी मंगळवारी ना. ठाकूर यांची भेट घेऊन निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, अदिती स्वामी आणि ओजस देवतळे यांच्या देदीप्यमान कामगिरीबरोबरच, युवा जागतिक विजेता असलेला पार्थ सुशांत साळुंखे हा पहिला भारतीय खेळाडूसुद्धा सातारा जिल्ह्यातील आहेत.
या सर्वांच्या कामगिरीचा केवळ सातारा जिल्ह्यातील नव्हे, तर महाराष्ट्रातील नागरिकांना अभिमान आहे. जिल्ह्यातील गुणी खेळाडूंना दर्जेदार पायभूत सुविधा मिळाल्यास, त्यांना आपली क्षमता सिद्ध करता येईल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या सरावासाठी सातारा जिल्ह्यात आधुनिक क्रीडांगण उभारण्यात यावे. सातार्यातील छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुलात सिंथेटिेक ट्रॅक, क्लायम्बिंग वॉल आणि अन्य पायाभूत सुविधा केंद्र शासनाचा माध्यमातून उपलब्ध व्हाव्यात. दरम्यान, याबाबत योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन ना. ठाकूर यांनी दिले.