भाजप नेते किरीट सोमैया यांचा साताऱ्यात इशारा
सातारा (प्रतिनिधी) – “पॉवरफुल’ असलेल्या पवार घराण्याची पश्चिम महाराष्ट्रातील आजारी सहकारी साखर कारखाने अल्प किमतीत विकत घेणाऱ्यांची “मोडस ऑपरेंडी’ आहे. मी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएच. डी. केली आहे. सनदी लेखापाल परीक्षेत मी राष्ट्रीय स्तरावरचा सुवर्णपदक मिळवले आहे. कारखाने विकत घेणारे हेच, व्हॅल्युएटर यांचेच आणि लिलाव प्रक्रियेतसुध्दा हेच. पवार परिवाराने शिकण्यासाठी मला वेगळा विषय दिला आहे, अशी टोलेबाजी भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी केली. दरम्यान, जरंडेश्वर कारखाना कवडीमोल किमतीने विकण्यात आला. या कारखान्याच्या शेतकरी सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी 5 ऑक्टोबरला मी कारखान्यात जाणार आहे. त्यानंतर बारामतीला जाणार आहे, अशी माहिती सोमैया यांनी दिली.
कोल्हापूरकडे जाण्यापूर्वी किरीट सोमैया हे मंगळवारी पहाटे सातारा येथे शासकीय विश्रामगृहात थांबले होते. तेथे सकाळी सात वाजता जरंडेश्वर कारखान्याच्या उपाध्यक्ष व संचालकांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. तेव्हा सोमैया यांनी त्यांच्याशी चर्चा करून 5 ऑक्टोबरला जरंडेश्वर कारखान्याला भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर सोमैया यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, जरंडेश्वर कारखान्याचे मूळचे उपाध्यक्ष व संचालक भेटायला आले. प्रत्यक्ष काय झाले? शेतकऱ्यांच्या जमिनी दाखवून कारखाने उभे झाले. कालांतराने ही सर्व मालमत्ता राजकीय नेत्यांची स्वतःची इस्टेट व्हायला लागली. काही कारखाने अडचणीत होते. ते कोणी तरी चालवायला घेतले. काही ठिकाणी घोटाळे झाले. तेथील शेतकऱ्यांना न्याय मिळावा.
पारनेर कारखान्याची 150 एकर जमीन पडून आहे. कारखान्याला 125 एकर जमीन दिली होती आणि आता 150 एकर जमीन गिळंकृत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जरंडेश्वर 65 कोटीला बेनामीपणे विकत घेण्यात आला आहे. “मोड ऑफ ऑपरेशन’ सगळीकडे समान आहे. हसन मुश्रीफ असोत, की अजित पवार, शरद पवार असोत, की पारनेरचे राष्ट्रवादीचे नेते. पारनेरचा कारखाना राष्ट्रवादीच्या नेत्याने घेतला. त्याचे अंडर व्हॅल्युएशन करण्यात आले. सर्व ठिकाणी पवार परिवाराने दोन-चार व्हॅल्युअर सांभाळले आहेत. ते या संस्थांचे डिव्हॅल्युएशन करत आहेत. अनिल परब यांच्यात हिंमत नाही. “ईडी’कडे गेले, तर त्यांचे सगळे घोटाळे बाहेर येतील, असेही सोमैया म्हणाले.
परब यांनी तुमच्यावर शंभर कोटींचा दावा लावला आहे. त्याबद्दल तुमचे म्हणणे काय, असे विचारले असता, सोमैया म्हणाले, उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी मिळून परब यांच्या माध्यमातून शंभर कोटींचा दावा माझ्यावर दाखल केला आहे. त्यांना शंभर कोटींच्या आकड्याचे आकर्षण आहे. वसुली शंभर कोटींची आणि दावाही शंभर कोटींचा त्यांना शंभर कोटींचा मोहच आवरत नाही, अशी टीका ही सोमय्या यांनी केली.