वंचित गाव संघर्ष समितीचे उपमुख्यमंत्री अजितदादांना साकडे
वडूज – खटाव तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातील 11 टंचाईग्रस्त गावांच्या पिण्याच्या पाण्याची कायमस्वरुपी व्यवस्था होण्यासाठी जिहे कटापूर उपसा सिंचन योजनेद्वारे दरुज, दरजाई तलावात पाणी सोडून त्यापुढे बंदिस्त पाईपलाईन करण्याच्या मागणीसाठी 11 गाव पाणी संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, खटाव तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त दरूज-दरजाई, पेडगाव, सातेवाडी, मांडवे, तडवळे, हिंगणे, बोंबाळे, डांभेवाडी, येलमरवाडी, एनकूळ, कणसेवाडी, खातवळ या गावांची 2011 ची लोकसंख्या 18,050 व सध्याची 20,065 इतकी असून या गावांना दरवर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्यासाठी व जनावरांना तसेच इतर वापरासाठी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो.
पाण्याचे स्त्रोत शोधून पाणीपुरवठा करणे जिकीरीचे होते, यासाठी शासनाचा दरवर्षी चारा छावण्या व पाणीपुरवठा यासाठी सर्वसाधारणपणे 1 कोटी ते 2 कोटी इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करावा लागतो. मा. कार्यकारी अभियंता नळ पाणी पुरवठा विभाग सातारा या कार्यालयाच्या माहितीनुसार दुष्काळी खटाव माण तालुक्याची जिहे-कटापूर उपसा सिंचन योजनेद्वारे कोरेगाव तालुक्यातील कटापूर येथून कृष्णा नदीतून पाणी उचलून वर्धनगड बोगद्यातून नेर क्र. 1 व 2 राबवून पिण्यासाठी देण्यात येणार आहे.
यापैकी नेर उपसा सिंचन क्र. 2 च्या निढळ बाजूच्या पाईपलाईनद्वारे दरूज तलावात पाणी सोडणे शक्य आहे. याप्रकरणी स्वत: अजितदादांनी लक्ष घालावे, अशी मागणी शिष्ट मंडळाने केली आहे. दिवड, ता. माण येथे कार्यक्रमासाठी आलेल्या उपमुख्यमंत्र्यांना कार्यकत्यांनी समक्ष भेटून चर्चा केली.
यावेळी समितीचे अध्यक्ष शिवाजीराव साबळे, उपाध्यक्ष शशिकांत देशमुख, सचिव प्रसाद बागल, प्रा. अर्जुनराव खाडे, प्राचार्य दिलीपराव डोईफोडे, डॉ. संतोष देशमुख, प्रा. सदाशिव खाडे, मुन्ना खाडे, अमृत निंबाळकर, गणपतराव खाडे, विक्रम रोमण, पोपट पाटील, शिवाजी दुबळे, प्रभाकर निकम, सागर चंदनशिवे, विजय खाडे, सदाशिव खाडे, संतोष बोटे, ऍड. नितीन शिंगाडे, विजय जगदाळे, विक्रम रोमण, अनिल खाडे, अशोक देशमुख, सुनिल फडतरे, गणेश निंबाळकर, किशोर बागल, सुनिल खाडे, संपत साबळे, श्री. थोरवे आदी उपस्थित होते.