पुणे – गेल्या पाच वर्षांत पुणे विभागात झालेल्या एकूण अवयवदानात 35 हृदयरोपण शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यामध्येही बहुतांश अवयवदानात हृदय निकामी ठरते. त्यामुळे हृदयक्रिया खराब होऊन हृदय प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्यांना हृदय मिळवण्यासाठी खूपच वाट पाहावी लागते. दरम्यान, यासाठी जनजागृतीची वाढवण्याचीही तितकीच गरज निर्माण झाली आहे.
दि. 29 सप्टेंबर हा “जागतिक हृदय दिन’ म्हणून साजरा केला जातो. शरीराच्या एका सुरक्षित कुपित दडलेल्या या अवयवाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळेच या हृदयाची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
अवयव रोपण हे “अनकंडिशनल’ करता येत नाही. यकृताचा काही भाग देणे किंवा किडनी देणे हे “कंडिशनल’ असू शकते. त्यामध्येही काही अटी-शर्ती आणि नियम आहेत; परंतु फुफ्फुस, हृदय, नेत्र याचे प्रत्यारोपण यासाठी कायदा आहे. यासाठी ज्यांनी मागणी नोंदवली आहे, त्यांनाच ते देता येते. यामध्ये नातेवाइकांच्या मर्जीनुसार ठरावीक व्यक्तीला अवयवदान करता येत नाही. दरम्यान, गेल्या काही काळात अवयवदानाबद्दल काहीशी जाणीव समाजात आली आहे. मात्र, ते प्रमाण वाढल्यास आणखी किती तरी रुग्णांचा जीव वाचू शकतो.
आणखी 54 जण “वेटिंग लिस्ट’मध्ये
हृदय प्रत्यारोपणासाठी सध्या पुणे विभागात 54 जण “वेटिंग लिस्ट’मध्ये आहेत. हृदय ही अशी गोष्ट आहे ज्याचे प्रत्यारोपण हे अत्यंत जिकिरीचेच असते. “शरीरातील जीव काढून पुन्हा तो शरीरात फुंकणे’ अशी उपमा याला देता येईल. त्यामुळे हृदयाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.