पक्ष वाढीसाठी बूथ व ग्राम समिती स्थापन होणार
सातारा – पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी जिल्हा कॉंग्रेसने लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बूथ समिती, मंडळ समिती आणि ग्राम समिती स्थापन करण्यासाठी सर्व तालुक्यांना विशेष प्रभारी, निरीक्षक नेमले आहेत. त्यांच्यावर पक्ष संघटना मजबूत करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
याप्रसंगी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, ज्येष्ठ नेते विजयराव कणसे, बाबासाहेब कदम, अजित पाटील- चिखलीकर, शिवराज मोरे, मनोहर शिंदे, निवास थोरात, अल्पनाताई यादव, रजनीताई पवार, राहुल चव्हाण, अमित जाधव, प्राची ताकतोडे, विद्या थोरवडे, नीलम येडगे, छायादेवी घोरपडे, गीतांजली थोरात, रफिकशेठ बागवान, प्रा. धनाजी काटकर, प्रताप देशमुख, जगन्नाथ कुंभार, अमरजित कांबळे, एम. के.भोसले, रजुभाई मुलाणी, विश्वंभर बाबर, अन्वर पाशा खान यांच्यासह तालुकाध्यक्ष संदीप चव्हाण, संदीप माने, श्रीकांत चव्हाण, महेंद्र बेडके, संतोष गोडसे, बाबासो माने, पंकज पवार, विलास पिसाळ, मनोहर बर्गे, शिवाजी यादव उपस्थित होते.
तालुका स्तरावर पक्ष संघटना मजबूत करण्याची जबाबदारी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची असून प्रत्येक तालुक्यात बूथ, मंडळ आणि ग्राम समित्या एक महिन्याच्या आत स्थापन कराव्यात, प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या तालुक्यातील प्रत्येक आठवड्याला दोन जिल्हा परिषद गटात बैठका घेऊन बूथ, मंडळ आणि ग्राम समिती स्थापन करावी, असे निर्देश आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.
दरम्यान, जिल्हा कॉंग्रेसने गेल्या दहा दिवसांत पक्ष संघटना वाढीसाठी तीन बैठका घेऊन ज्येष्ठ नेते व तरुण कार्यकर्त्यांची मोट बांधून आगामी निवडणुकांची पायाभरणी सुरू केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाच्या मजबुतीसाठी लक्ष घातल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे.
पक्ष संघटनेचा भाग म्हणून महिला आघाडी, युवक कॉंग्रेस, सेवादल या आघाड्यांची तर ओबीसी, अल्पसंख्यांक आणि अनुसूचित जाती जमाती सेल यांची पुढील आठवड्यात चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.