– हेमंत देसाई
पुढच्या प्रत्येक दसरा मेळाव्याच्या निमित्ताने रण माजवण्यात काहीही अर्थ नाही. ठाकरे आणि शिंदे यांनी महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्याबाबतची आपापली भूमिका मांडावी.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून गेल्या वर्षी प्रचंड वाद झाला होता. शिवाजी पार्क किंवा शिवतीर्थावरून आम्हीच दसरा मेळावा घेणार, असा आग्रह एकनाथ शिंदे गटाने धरल्यावर उद्धव ठाकरे गटानेदेखील आक्रमक भूमिका घेतली. यावर्षीही दोन्ही गटांत यावरून वाद सुरू झाला होता. परंतु सुदैवाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही माघार घेतली, हे बरे झाले. शिवतीर्थावर सभा घेण्याचा रिवाज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केला. या सभांशी ठाकरे घराण्याचा संबंध ज्या पद्धतीने जोडला जातो, त्याप्रमाणे इतरांचा जोडला जात नाही. शिवाय हे शिंदे वर्षानुवर्षे ठाण्यातील शिवसेनेचे नेतृत्व करत होते.
त्यामुळे शिवतीर्थाशी त्यांचा तसा संबंधही नाही. म्हणून निवडणूक आयोगाने जरी त्यांना धनुष्यबाण व शिवसेना हे नाव दिले असले, तरीदेखील दसरा मेळाव्याचा परंपरेशी अधिक संबंध आहे आणि ठाकरे घराणे व शिवसैनिक या भावनिक नात्याचे ते प्रतीक आहे. म्हणूनच यापुढे देखील सर्वोच्च न्यायालयात निकाल काहीही लागो, दसरा मेळाव्यावरून शिंदे गटाने लहान मुलांप्रमाणे भांडण उकरून काढू नये, अशी अपेक्षा आहे. 2022 मध्ये न्यायालयात धाव घेत, शिवतीर्थावर दसरा मेळाव्याची परवानगी ठाकरे गटाने मिळवली. त्यावेळी शिंदे गटाचा मेळावा वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात पार पडला. यावेळी शिंदे गटाचा मेळावा मुंबईतील आझाद मैदानात होणार असून, “शिवसेनेला आझाद करण्याचं आणि धनुष्यबाण वाचवण्याचं काम आम्ही केलं आहे,
म्हणून हा मेळावा आझाद मैदानात घेत आहोत’ असा युक्तिवाद करण्यात आला. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी आमच्या मेळाव्यास रेकॉर्डब्रेक गर्दी होईल, असा आत्मविश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. मात्र त्याचवेळी, शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा हा रडगाणे गाणारा असेल, असा टोमणा मारण्याची त्यांना गरज नव्हती. “शिवसेनेचं एकच तत्त्व. साहेबांचं हिंदुत्व, साहेबांचं शिष्यत्व’ असे घोषवाक्य असलेला टीझर शिंदे गटाने लॉंचही केला आहे. ठाकरे गटानेही मेळाव्याची जय्यत तयारी सुरू केली आहे.
शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा 30 ऑक्टोबर 1966 रोजी झाला. शिवसेनेच्या स्थापनेनंतरचा हा पहिलाच मेळावा होता. त्यावेळी वर्तमानपत्रांनी या मेळाव्याची फारशी पूर्वप्रसिद्धी केली नव्हती आणि तेव्हा शिवसेनेपाशी “सामना’ही नव्हता. परंतु “मार्मिक’ हे साप्ताहिक या संघटनेच्या पाठीशी उभे होतेच. या मेळाव्यासाठी मुंबईच्या वेगवेगळ्या भागांतील कार्यकर्ते शिवतीर्थाकडे आले होते.
त्यावेळी शिवसेना मुंबईपुरतीच मर्यादित असल्यामुळे अन्य शहरांतून कार्यकर्ते येण्याचा संभवच नव्हता. व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार स्वतः हजर होते. त्यांच्या सोबत श्रीकांत ठाकरे तसेच प्रा. स. अ. रानडे आणि ऍडव्होकेट बळवंत मंत्री हे बाळासाहेबांचे सहकारीही उपस्थित होते. विशेष म्हणजे, व्यासपीठावर कॉंग्रेसचे नेते आणि पुढे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालेले रामराव आदिक हेही होते. त्यावेळी आदिकदेखील मराठी तरुणांसाठी स्वतंत्रपणे काम करत होते. या पहिल्या मेळाव्यात शाहीर साबळ्यांनी आपल्या गगनभेदी आवाजात महाराष्ट्रगीत म्हटले होते. आपल्या भाषणात बाळासाहेबांनी “मराठी माणूस जागा झाला असून, तो यापुढे कोणताही अन्याय सहन करणार नाही. राज्य सरकारला मराठी तरुणांची दखल घ्यावीच लागेल’, असा स्पष्ट इशारा दिला. महाराष्ट्राला आज खरी गरज राजकारणापेक्षा समाजकारणाची अधिक आहे. महाराष्ट्रवाद जागवला पाहिजे, हे मुद्दे मांडतानाच राजकारण हे गजकर्णासारखे आहे, असेही बाळासाहेब त्यावेळी म्हणाले होते.
समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते एसेम जोशी यांनी त्यापूर्वी शिवसेनेवर प्रांतीयवादाचा व जातीयवादाचा आरोप केला होता. तेव्हा ही संघटना जातीयवादी नसून, मराठी माणसाच्या संकटकाळातही जो मैत्री करतो, तोच मराठी, असे उद्गार बाळासाहेबांनी काढले होते. तर “मराठी रक्त भ्रष्ट नाही, मराठी माणूस हा अन्यायाशी झगडायला तयार आहे, हे आज तुम्ही दाखवून दिलं आहे. मराठी माणसाने आपापसात भांडू नये’, असे प्रतिपादन आपल्या भाषणात प्रबोधनकारांनी केले होते. “इतके दिवस हा बाळ ठाकरे कुटुंबीयांचा होता, आज हा बाळ मी तुम्हाला दिला’, असे भावपूर्ण उद्गार प्रबोधनकारांनी काढले, त्यानंतर सातत्याने दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी वेगवेगळ्या प्रश्नांवर आपले विचार मांडले आणि भूमिकाही स्पष्ट केली. बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी दरवर्षी शिवसैनिकांचे थवेच्या थवे शिवतीर्थावर लोटत असत.
या सभांमधील विचारांनी प्रभावित होऊन हजारो शिवसैनिक तयार झाले आणि पुढे राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सत्ताही आली. मनोहर जोशी, नारायण राणे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे चार मुख्यमंत्री झाले. आज शिवसेनेत दुफळ माजली असली, तरी शेवटी बाळासाहेबांच्या मुशीतूनच एकनाथ शिंदे तयार झाले, हे स्पष्ट आहे. शिवसेनेची दोन शकले झाली असली, तरी यापुढे प्रत्येक दसरा मेळाव्याच्या निमित्ताने यावरून रण माजवण्यात काहीही अर्थ नाही. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्याबाबतची आपापली भूमिका उपस्थितांपुढे मांडावी. भविष्यात मराठी तरुण-तरुणींना नोकऱ्या व व्यवसाय-उद्योग करण्यासाठी आपण काय करणार आहोत, याची रूपरेषा विस्ताराने मांडावी. शेवटी दसरा हा विचारांचे सोने लुटण्यासाठीच असतो, हे विसरू नये.