सातारा पालिकेची घरकुल योजना पुन्हा वादात
सातारा – आकाशवाणी झोपडपट्टी, मतकर कॉलनी झोपडपट्टी, गेंडामाळ कब्रस्थान झोपडपट्टी, कुष्टरोग झोपडपट्टी आदी ठिकाणच्या सर्वच नागरिकांनी एकीची वज्रमुठ आवळत आम्ही आहे या जाग्यावर हलणार नाही. आहे याच जाग्यावर आम्ही राहणार आहे, असा निर्धार आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत केला. यावेळी धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर, कामगार संघटनेचे नेते अतुल दिघे यांनी उपस्थित राहून या लढ्यात सहभाग नोंदवण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे आता झोपडपट्टीवासियांच्या लढ्याला उग्र स्वरुप येणार आहे.
शिवशक्तीनगर येथील चौकात शनिवारी दुपारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर, कामगार संघटनेचे नेते अतुल दिघे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव गणेश भिसे, संदीप कांबळे, सचिन कांबळे, गणेश वाघमारे, मनोज घाडगे यांच्यासह झोपडपट्टीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
हिना कच्छी म्हणाल्या, आम्ही या झोपडपट्टीत कित्येक वर्षापासून रहातो आहोत.
पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सात दिवसाची मुदत दिली आहे. ती आम्हाला मान्य नाही. या जागेत आम्ही खर्च घातला आहे. येथून नव्या जागेत जावून तिथे खर्च करायचा आणि पुन्हा तेथून आम्हाला उठवणार. आम्ही आमच्या पोराबाळांच्या पोटाला चिमटा काढून खोपटं उभे केले. आणि त्याच खोपटातून हे हलवा म्हणतात. अनेक वेळा बैठका झाल्या, अनेक वेळा आंदोलने झाली. कुठून आणायचे सारखे सारखे पैसे झोपडी बांधायला. आम्हाला नको तुमची बिल्डींग आम्ही येथेच राहणार आणि येथेच राहणार अशी भावना व्यक्त केली.
गणेश वाघमारे म्हणाले, इथे ४० वर्षाहून अधिक काळ झोपडपट्टी आहे. गणेश पायगार म्हणाले, हा त्रिशंकू भागात जेव्हा परिसर मोडत होता. तेव्हा कोणी निधी टाकला नव्हता. आता विकास कामाचा महापूर वाहत आहे. पण हा विकास करत असताना इथल्या लोकांना विचारात घेतलं का, ही मोक्याची जागा आहे. मोक्याची जागा टिकवली आणि राखली आणि आज त्यांनाच उठवण्याची खटपट सुरु आहे. इथल्या नागरिकांचा सर्व्हे केला का? पालिकेने लोक कशी रहातात, कुठे कामाला जातात, सर्व्हे केला नाही. त्यांनी सर्व्हे केला तो घरे कशी बांधता येतील याचा.
आंदोलनात डॉ. भारत पाटणकर यांची उडी
आकाशवाणी झोपडपट्टी येथील घरकुल प्रकल्पाबाबत अनेक वेळा आंदोलने झाली आहेत. आता या आंदोलनात डॉ. भारत पाटणकर यांनी उडी घेतली असून हे आंदोलन आता तीव्र होणार आहे. त्यामुळे या आंदोलनाच्या दिशेवर नेमक्या काय घडामोडी होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. पालिकेने इथल्या लोकांच्या भावनाचा विचार केला नाही. त्यामुळे आता येथून हलायचे नाही. ही जागा सोडायची नाही, असा निर्धार करण्यात आला.