पुणे – स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर अंदमानची काळ्यापाण्याची शिक्षा भोगून काही काळ रत्नागिरी आणि नंतर पुण्याच्या येरवडा कारागृहात बंदी होते. जनतेच्या दबावामुळे सरकारने त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला तब्बल १४ वर्षांची कष्टप्रद शिक्षा भोगून सहा जानेवारी १९२४ साली येरवडा तुरुंगातून ते मुक्त झाले. या ऐतिहासिक मुक्ततेची शताब्दी विद्यार्थ्यांनी येरवडा कारागृहासमोर ‘जयोस्तुते श्री महन्मंगले’ या गीताचे समूहगायन करत साजरी केली आणि भारत माता की जय चा जयघोष करत स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानवंदना दिली.
इतिहास प्रेमी मंडळ आणि सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्पाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुक्ततेची शताब्दी साजरी करण्यात आली. यावेळी माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, समता बालक मंदिराचे विश्वस्त शिवाजी ठोंबरे, उद्योजक गणेश बाबर, जनहित प्रतिष्ठानचे सुरेश घाटे, मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे, मुख्याध्यापिका अनिता भोजने उपस्थित होते. समता बालक मंदिर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी यावेळी समूहगायन केले.
सावरकरांची सुटका होणार हे कळल्यावर त्यांचे मावसबंधू डॉ. वि. म. भट त्यांना आणायला गेले. तुरुंगाचे एक लेखनिक म्हात्रे यांनी दिलेले धोतर, कोट, टोपी घालून सावरकर भट यांच्या घरी आले. त्यांच्या सुटकेची बातमी कळताच न. चिं. केळकर , शि. म. परांजपे आणि शे-दिडशे लोक भेटायला आले. आपण रामाप्रमाणे चौदा वर्षे वनवास भोगलात असे लोक म्हणाले.
पण सावरकर म्हणाले की, रामाने रावणाचा वध करून आपले ध्येय साध्य केले होते. पण, भारताच्या स्वातंत्र्याचे माझे ध्येय अजून साकार झाले नाही. आता पुन्हा एकदा ‘स्वातंत्र्यलक्ष्मी की जय’ असा नारा सावरकर यांनी दिल्याची आठवण मंडळाचे अध्यक्ष शेटे यांनी सांगितली. आभार प्रदर्शन सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्पाचे प्रमुख विजय शिवले यांनी केले.