कोयनानगर – यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने कोयना धरणातील कमी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे सिंचन आणि वीजनिर्मितीसाठीच्या पाणी वापरात कपात करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली.
वीज प्रकल्पासाठी देण्यात येणाऱ्या पाणीसाठ्यात 12 टीएमसी कपात करून, हा पाणीसाठा सातारा व सांगली जिल्ह्यातील सिंचन आणि दुष्काळ निवारण्यासाठी देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार पाणी वाटपाचे फेरनियोजन करण्यात आले आहे. कोयना धरणाची क्षमता 105.25 टीएमसी आहे. यंदा पावसाळ्यापूर्वी दि. 1 जून रोजी धरणात 17.64 टीएमसी पाणीसाठा होता. गेल्यावर्षाच्या तुलनेत पर्जन्यमानात 440 मिमी आणि पाणी आवक 39.71 टीएमसीने घटली.
दि. 1 जून ते 14 ऑक्टोबर या कालावधीत सिंचन व वीजनिर्मितीसाठी अनुक्रमे 5.46 व 23.03 टीएमसी पाणीवापर झाला आहे. रब्बी व उन्हाळी हंगामामधील पाणी वापराच्या नियोजनाबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यात सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये धरणातून रब्बी व उन्हाळी हंगामात सिंचन व वीजनिर्मितीसाठी होणार पाणीवापर प्रत्येकी 35 टीएमसीच्या मर्यादेत करण्याबाबत निर्देश दिले आहेत. धरणातून रब्बी व उन्हाळी हंगामातील सिंचनासाठी अनुक्रमे 25.45 व 12.41 टीएमसी, म्हणजे एकूण 37.86 टीएमसी पाणी वापर नियोजित आहे. तथापि, रब्बी व उन्हाळी हंगामातील पाणी वापर 35 टीएमसी इतक्या मर्यादेत करण्याचे प्रस्तावित आहे.
त्यापैकी सातारा जिल्ह्यासाठी तीन, तर सांगली जिल्ह्यासाठी 32 टीएमसी पाणीवापर नियोजित आहे. गेल्यावर्षी दि. 15 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर दरम्यान रब्बी हंगामात 1.42 टीएमसी पाण्याचा वापर झाला होता. यावर्षीच्या नियोजनानुसार रब्बी हंगामातील ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांमध्ये सांगली सिंचन विभागाच्या मागणीनुसार, धरणामधून दोन टीएमसी पाणी यापूर्वीच सोडण्यात आले आहे.
पुढील कालावधीसाठी नियोजन
यंदा कमी पर्जन्यमानामुळे धरणातील पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन आवश्यक आहे. पुढील वर्षी जून व जुलै महिन्यात धरणामध्ये अपेक्षित आवक न झाल्यास पिण्यासह इतर आवश्यक गरजांसाठी किमान पाणीसाठा उपलब्ध राहील. त्यामुळे रब्बी हंगामामधील प्रत्यक्ष पाणी वापर आणि धरणातील शिल्लक पाणीसाठा यांचा विचार करून मार्च 2024 मध्ये उन्हाळी हंगामातील पाणी वापराचे फेरनियोजन करण्यात येईल.
रब्बी व उन्हाळी
हंगामासाठी पाणी वापर
धरणातील पाणीसाठ्याच्या कमतरतेमुळे रब्बी व उन्हाळी हंगामातील पाणीवापर 11.71 टीएमसी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यापैकी सिंचनासाठी पाणी वापरात 2.86 आणि वीजनिर्मितीच्या पाणीवापरात 8.85 टीएमसी पाणी कपात प्रस्तावित आहे. त्यानुसार जलसंपदा विभागाच्या पुणे येथील मुख्य अभियंत्यांनी रब्बी व उन्हाळी हंगामातील सिंचन व वीजनिर्मितीसाठी एकूण 70 टीएमसी पाणीवापर करण्याचे सूचित केले आहे.
खरीप हंगामातील
सिंचनासाठी पाणी वापर
कोयना धरणातून सिंचनासाठी 42.70 टीएमसी वार्षिक पाणी वापराचे नियोजन आहे. खरीप हंगामात दि. 1 जुलै ते 14 ऑक्टोबर दरम्यान 4.39 टीएमसी पाणी वापराचे नियोजन होते. कोयना प्रकल्पांतर्गत बहुतांश सिंचन क्षेत्र सांगली जिल्ह्यातील असल्याने, तेथील मागणीनुसार धरणातून विसर्ग करण्यात येतो. गेल्यावर्षी खरीप हंगामात झालेला पाणी वापर 0.47 टीएमसी होता. यंदा खरीप हंगामातील ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात सांगली सिंचन विभागाकडून झालेल्या मागणीनुसार धरणामधून 2.36 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. गतवर्षीपेक्षा दोन टीएमसी पाणी जादा देण्यात आले आहे.