वाई -छत्रपती शिवरायांच्या देदिप्यमान पराक्रमाची साक्ष देणारा किल्ले प्रतापगड शुक्रवारी रात्री मशालींच्या प्रकाशाने उजळून निघाला. हा मशाल महोत्सव पाहण्यासाठी व श्री भवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
किल्ले प्रतापगडवासिनी श्री भवानीमातेच्या मंदिरास 364 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हजारो शिवभक्तांनी प्रतापगडावर मशाल महोत्सव साजरा केला. नवरात्र उत्सवात अश्विन शुद्ध षष्टीला हा उत्सव साजरा केला जातो. शुक्रवारी भवानीमातेची रात्रीची विधिवत पूजा व गोंधळ झाल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात “जय भवानी जय शिवाजी,’ “छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या जयघोषात मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरु होता. यावेळी नगारे, तुतारी, सनई तसेच प्रतापगडावरील प्रसिद्ध स्वराज्य ढोल ताशा पथक व लेझीमच्या गजरात तसेच भगवे झेंडे फडकावत मशाली पेटून दीपोत्सव साजरा झाला. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. भवानी माता मंदिर ते बुरुजापर्यंत लावण्यात आलेल्या मशालींमुळे गड व परिसर उजळून निघाला होता. किल्ल्याच्या चहुबाजूनी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रात्रीच्या किर्र अंधारात मशालीच्या उजेडाने उजळून निघालेला गड कॅमेऱ्यात टिपण्यासाठी कार्यकर्ते, भाविकांची धडपड सुरू होती. भाविक व कार्यकर्त्यांसाठी ग्रामस्थांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते.मागील अनेक वर्षांपासून गडावर मशाल महोत्सवाचे आयोजन येथील हस्तकला केंद्राचे चंद्रकांत आप्पा उतेकर, संतोष जाधव, अभय हवलदार, स्वराज्य ढोल पथक, माय भवानी सामाजिक संस्था, स्वस्तिक ग्रुप, डान्सर पालघर, शिवमुद्राकन प्रतिष्ठान पोलादपूर, प्रतापगड व वाडा कुंभरोशी ग्रामस्थ करीत असतात. किल्ले प्रतापगडावर भवानीमाता मंदिरात नवरात्रीत दोन घट बसविले जातात. एक घट शिवाजी महाराजांच्या नावाने. कारण छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली म्हणून तर दुसरा घट हा राजाराम महाराज यांच्या नावाने. कारण त्यांनी स्वराज्याचा पाया मजबूत केला म्हणून. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरु आहे.