कडधान्यांनी राखेत विश्रांती घेतलेली असायची. उंच उंच जोंधळा हिरव्या पानातून टपोऱ्या हिरव्या दाण्यासह वाऱ्यावर डुलायचा, दुधाने भरलेले हिरवेकंच गोड दाणे खायला पाखरांची झुंबड उडायची. कुणाचा हायब्रीड निसवत असायचा, कुणाचा पोटऱ्यात आलेला असायचा तर कुणाचा कापणीला. हत्तीच्या पावसाने कोसळून भिंतीवर आलेले ओघळ पोतेऱ्याने साफ व्हायचे. मिरगापासून लागलेल्या पावसाच्या झडीने सगळं कसं हिरवंगार केलेलं असायचं.
हिरवा ओला सुगंध साऱ्या शिवारभर घुमायचा! सगळीकडे शेतातून निथळलेले पाणी खळाळत ओढ्या-ओघळीला मिळायचे. गढूळ लेले ओढे निवळायचे अन् दुथडी भरून वहायचे. किनाऱ्यावरच्या तापलेल्या वाळूवर आणि पावसाने धुतलेल्या दगडावर परटाचे कपडे वाळण्यासाठी पहुडायचे. आया बायांची धुण्यासाठी ओढ्यावर ही गर्दी! मोठमोठ्या वाकळा, चादरा, अगदी पोती पटकूर सारे या ओढ्यात खळाळा धुऊन निघायचे. वाकळा धुवायला, आपटायला ओढ्यात धुणे धुवायला आलेली आई-बाई कुणीही मदत करायची.
वाकळांच्या आपटण्याबरोबर मनात साचलेल्या सासुरवासाच्या, संसाराच्या साऱ्याच गोष्टी दगडावर आपटल्या जायच्या आणि मनही स्वच्छ व्हायचं, निवळसंक. धुणे काठावर उन्हात विसवायचे अन् मग कुणाची तरी मिसरी निघायची. चार बोटं इकडं तिकडं फिरवत धुण्यावर नजर ठेवायची. कुणाची फडक्यावरची भाकरी भुकेच्या अग्नीत स्वाहा व्हायची. सकाळी लवकर गर्दी व्हायच्या आत धुण्याचं बोचकं घेऊन उपाशी अनुशी आलेल्या बायका मुलं भाकरीचं गठूळ सोडून क्षुधा शांती करायची. लहान पोरं, गुरं पाण्यात निवांत डुबक्या मारत बसायची.
ही सगळी पूर्वतयारी त्या घटस्थापनेची! गुरव पत्रावळी देऊन जायचा. अडगळीतली मोठी पणती लख्ख व्हायची. नऊ दिवस अखंड ज्योत चालण्यासाठी वातीचे लांबलचक पेंड गणगटाला अलगद गुंडाळून पणती वर ठेवायचे. शेतातून वावरी अन् गाडग्यातली पाच धान्ये स्वतःला गाडून घ्यायची त्या ओलसर वावरीत. शेतांचे किनारे कारळाच्या फुलांनी पिवळेधम्मक व्हायचे. शेतकऱ्याचे नजाकतीने पेरलेले ते धान्य अशी शेतांची शोभा वाढवायचे.
नऊ दिवस नऊ फुलांची हीच माळ देव्हाऱ्यावर सजायची. मंदिरात कीर्तन भजन रंगायचे देवाची आरती, ढोलाच्या गजरात पार पडायची. रूपे नऊ दिवस बदलत राहायची. डवरी कुलस्वामीच्या आरतीला घरोघरी यायचा. मापटे, चिपटे, कुऱ्हाड, कुदळ, खोरे, नांगर शेतकऱ्यांची औजारे धुऊन लख्ख व्हायची, शस्त्रपूजेला नटून थटून बसायची.
कडकण्या धपाटीचा नैवेद्य जागराला अन् पुरणपोळी दसऱ्याला! लोक सोनं लुटायला एकमेकांकडे जात, गप्पा, पीकपाणी यावर चर्चा व्हायच्या. सगळं कसं यथासांग होऊन मग देव उठायचे.
भोळ्या भक्तिभावावर देव खूश असायचा जणू. एक परंपरा, एक अध्यात्मिक जागर संपवून शेतकरी शेतात पिकाच्या राखणीला अन् कापणीला सज्ज व्हायचे! जशी आर्थिक परिस्थिती तसा नैवेद्य. सण आनंदाचा, काम आनंदाने करत राहायचे, डोळ्यात तेल घालून शेतांची अन् गुरांची राखण यातून भलत्या सलत्या विचाराला वाव कुठे होता?
बारा सणांच्या माळेतील हा ही एक सण माळेतून कमी व्हायचा. आनंद दुथडीभर वाहायचा गोड घासांची देवाणघेवाण शेजारीपाजारी व्हायची. एकमेकांच्या तिखट मिठाची चव जिभेवर घेत परस्पर संबंध प्रेमात बांधले जायचे! कसल्या गोष्टींचा बाऊ नाही की तक्रार नाही. कमी अधिक असेल नसेल तर घाम गाळून भाजीभाकरी तर पोटभर मिळाली याचाच मोठा आनंद असायचा. अंगावरचे कपडे नवीन काय अन् फाटलेले काय दोन्हीचे सुख दुःख तेवढेच! आहेचा माज नाही अन् नसल्याची लाजही! आता म्हणे काळ बदलला. खरेच कोडे पडते मला नेमकं काय बदललं काळ का माणसे?
– सुचित्रा पवार