विजयकुमार कुलकर्णी
पुणे – अल्पवयीन मुला-मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. अत्याचाराच्या 40 ते 50 टक्के खटल्यात जवळचे नातेवाईक, शेजारी राहणारे आणि मित्रमंडळीच मुला-मुलींना टार्गेट करत आहेत. न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्यातून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
पुण्यासारख्या सुसंस्कृत जिल्ह्यात बाललैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्या असून, मागील पाच वर्षांत सुमारे दोन हजारहून अधिक खटले न्यायालयात दाखल झाले आहेत. 14 ते 18 वर्षांपर्यंतच्या अल्पवयीन मुलींना लग्नाच्या आमिषाने पळवून नेले जाते. अशा प्रकारे दाखल होणाऱ्या खटल्याचे प्रमाण मोठे आहे. याबरोबरच शिक्षक, उच्चपदस्थ अधिकारी, शाळेतील शिपाई, वॉचमन, स्कूल व्हॅनचे चालक आणि वाहक यांच्याकडून मुलांवर अत्याचार केले जातात.
मात्र, त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे नातेवाईकांकडून मुलांना टार्गेट करण्यात येत आहे. अशा प्रकारे दाखल होणाऱ्या दाव्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. ज्या नातेवाईकांवर मुले विश्वास ठेवतात. त्यांनीच मुलांवर अत्याचार करणे दुर्दैवी आहे. मित्रमंडळी अथवा शेजारी राहणाऱ्यांकडून किरकोळ कारणावरून झालेले भांडण आणि इतर राग म्हणून त्या कुटुंबातील लहान मुलांना टार्गेट केले जाते. मित्रमंडळीकडून मुलांनाच जास्त प्रमाणात टार्गेट करण्यात येते.
“काका, मामा, चुलत भाऊ, मामेभाऊ, आत्येभावाकडून लहान मुले-मुलींना लैंगिक अत्याचारासाठी टार्गेट केले जात आहे. अलीकडे वडिलांकडून मुलांवर अत्याचार केल्याचे खटलेही दाखल होत आहेत. एकूणच समाजातील विकृती वाढल्याचे यावरून दिसून येत आहे. शाळांमध्ये विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत हे गुन्हे उघड होण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे हे रोखण्यासाठी शाळांमधूनच प्रबोधन झाले पाहिजे. स्वयंसेवी संस्था जागृतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. आई-वडिलांनी मुलांशी मित्रत्वाचे नाते ठेवले पाहिजे. मुलांना विश्वासात घेऊन विचारपूस केली पाहिजे.” -ऍड. रवि लाढाणे पाटील, माजी उपाध्यक्ष, पुणे बार असोसिएशन
“आरोपी नात्यातील अथवा मित्र परिवारातील असल्याने पीडितेच्या कुटुंबीयांच्या फितुरीसाठी प्रयत्न केले जातात. यासाठी पीडिताच्या कुटुंबातील व्यक्तींना घराण्याची अब्रु जाणे, पैशाचे आमिष आणि विशेषत: झाले गेले विसरून जाऊ, असे सांगून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, अशा प्रकारे अत्याचार झालेल्या मुलांच्या भवितव्याचे काय, असा विचारही केला पाहिजे. आई-वडिलांनी ठामपणे मुलांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. अत्याचार करणारी व्यक्ती जरी घरातील असली, तरीही तिच्यावर कायदेशीर कारवाईसाठी तत्परता दाखविली पाहिजे.” – ऍड. कमलेश गावडे, फौजदारी वकील