वाहनधारक झाले त्रस्त… बोरगाव ते वाघवस्ती रस्त्याची चाळण
विजय घोरपडे
नागठाणे – सातारा तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोरगाव- नांदगाव रस्त्याच्या बोरगाव बस स्थानक ते वाघ वस्ती या टप्प्याची नुसती चाळण झाली आहे. वाहन चालवताना नेमका कुठला खड्डा चुकवावा व कुठला नको या विचारात चालक गोंधळून जात आहेत. परिणामी वाहनांचे अपघात व मेंटेनंन्स वाढत आहेत. अनेकांना हाडांच्या दुखण्याने त्रस्त केले आहे. परिणामी प्रचंड आर्थिक भुर्दंडही सोसावा लागतोय. त्यामुळे हा रस्ता म्हणजे रस्त्यात खड्डे, की खड्डयात रस्ता, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बोरगाव ते नांदगाव हा रस्ता दोन विधानसभा मतदारसंघातील अनेक गावे जोडणारा आहे. नांदगावपासुन पुढे तो कृष्णा नदी पार करून कोरेगाव तालुक्याला जोडला जातो. तिथून तो महाबळेश्वर- विटा राज्यमार्गाला रहिमतपूर व पुसेसावळी येथे जोडला जातो. त्यामुळे अनेक प्रवासी वाहनधारक या बोरगाव नांदगाव रस्त्याचा मधला मार्ग म्हणून उपयोग करतात. तसेच औंध (ता. खटाव) घाटमाथ्यावरील वर्धन ऍग्रो व पडळ (ता. खटाव) येथील के. एम. शुगर, अजिंक्यतारा, सह्याद्री, जयवंत शुगर या साखर कारखान्यांची ऊस वाहतूक या रस्त्याने होते.
दुसरी महत्वाची बाब म्हणजे बोरगाववरून तीर्थक्षेत्र वर्णे आबापुरीला याच मार्गाने जाणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी आहे. काळभैरव यात्रेला इथे लाखो भाविक महाराष्ट्रभरातून येत असतात. देशपातळीवर सैनिकांचे गाव म्हणून नावारूपाला आलेल्या अपशिंगे (मिलीटरी) गावाला भेट देण्यासाठी अनेक जण येतात. सैन्यदलातील अनेक उच्चपदस्थ अधिकारीही वारंवार येतात. पण अशा गावाला जाणारा रस्ता असा असेल तर चर्चा होणारच. एकंदर या रस्त्यावरची वाहतूक कमालीची वाढली आहे. प्रथम हा रस्ता जिल्हा परिषदेच्या अखत्यारित होता. त्यानंतर तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाला. एक वर्षापूर्वी जवळपास पाच कोटींचा निधी या रस्त्यासाठी मिळाल्यानंतर वाघवस्ती ते नांदगाव या 12 किलोमीटरच्या रस्त्याचे काही अंशी रूंदीकरण व उर्वरीत मजबुतीकरण झाले.
वास्तविक बोरगाव बस स्टॅंडपासूनच पूर्ण काम होणे अपेक्षित होते. परंतु, ते वाघवस्तीपासुन पुढेच का घेतले याचे गौंडबंगाल नेमके काय, हे परिसरातील नागरिकांना समजले नाही. बोरगाव स्टॅंड ते वाघवस्ती या दीड किलोमीटर अतंरात आतापर्यंत नुसती मलमपट्टी केली जातेय. पण आता त्याचे मजबुतीकरण होणे गरजेचे आहे. सध्या मॉन्सूनने परतीचा प्रवास जवळपास पूर्ण केलाय. पण मोसमात जेवढा पाऊस पडला तेवढ्यानेच खड्डयांना उखडून टाकले आहे. असंख्य खड्डयांमुळे अनेक वाहनधारक घायकुतीला येत आहेत. रस्त्याची ही दयनीय अवस्था अभियंत्याला का दिसत नाही? की दिसत असूनही जाणूनबुजून डोळ्यावर गांधारीची पट्टी ओढली जातेय, हे परिसरातील नागरिकांना व वाहनधारकांना समजेनासे झाले आहे.लवकरात लवकर हा रस्ता चांगला झाला नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या
अभियंत्याच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणारअसल्याचे सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले.
एक काळ असा होता..
नांदगावचे सुपुत्र तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष कै. बाबूराव घोरपडे (गुरूजी) यांच्या कार्यकाळात या रस्त्याला उर्जितावस्था होती. त्यांच्या कार्यकालात नांदगाव व तारगाव ही दोन गावे व तालुक्यांना जोडणाऱ्या कृष्णा नदीवरील पुलाचीही निर्मिती झाली. गुरूजींची राजकीय ताकद एवढी होती की पुलाच्या उदघाटनासाठी तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले हेलीकॉप्टरने नांदगावला आले होते, सी आठवण जुन्या पिढीतील लोक सांगतात. त्याकाळी रस्ते निर्मिती व देखभाल बांधकाम विभाग करत असे. अध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतर घोरपडे गुरूजी नांदगाव मुक्कामी असणाऱ्या एसटी बस अथवा त्यांच्या जीपनेच करत. पदमुक्त झाल्यानंतरही झेडपीतील यंत्रणेवर त्यांचा दरारा कायम होता.