कराड – “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य असलेल्या पोलीस दलाला कायदा सुव्यवस्था राखण्यात गावाखेड्यात काम करणारे पोलीस पाटील मानधनापासून वंचित आहेत. शासन आणि गाव यामधील महत्त्वाचा दुवा असलेले आणि प्रामाणिकपणे काम करणारे पोलीस पाटील “बिनपगारी, फुल अधिकारी’ झाले आहेत.
पोलीस पाटलांना असलेले तुटपुंजे मानधन गेल्या पाच वर्षांमध्ये महिन्याच्या महिन्याला वेळेवर मिळत नाही. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, कोतवाल, कंत्राटी शिक्षकांचे मानधन शासनाने काही महिन्यांपूर्वी वाढवले; परंतु पोलीस पाटलांच्या मानधनात अजूनही वाढ करण्यात आलेली नाही. पोलीस पाटलांच्या कक्षेत नसणारी ई-पीक पाहणी, मतदार नोंदणी, आदी कामे त्यांना करावी लागत आहेत. व्यवसाय करून पोलीस पाटील म्हणून काम करता येते, असे पोलीस पाटील अधिनियम 1967 मध्ये नमूद आहे; परंतु सध्या पोलीस पाटीलकीच्या कामातून वेळ काढून व्यवसाय करावा लागत आहे.
मग, ती शेती असो की, इतर व्यवसाय असो. त्यामुळे व्यवसायावर परिणाम होत आहे. कधीच वेळेत न मिळणाऱ्या आणि त्यातही तुटपुंज्या असलेल्या मानधनात पोलीस पाटलांना त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे, मुलांना उच्च शिक्षण देणे कठीण झाले आहे. चार पैसे असले की, सण व्यवस्थित साजरे करता येतील, अशी त्यांच्या कुटुंबांची अपेक्षा आहे; परंतु गेले सहा महिने मानधन मिळाले नसल्याने गणेशोत्सव, दसरा आदी सण साजरे करण्यात अडचणी आल्या. आता दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांचे मानधन मिळावे, म्हणजे आमच्या कुटुंबांना इतरांप्रमाणे सण साजरा करता येईल, अशी मागणी पोलीस पाटलांनी केली आहे.
गावखेड्यात कायदा सुव्यवस्था राबवण्यात पोलिसांना हातभार लागावा आणि माहिती वेळेत मिळावी, यासाठी पोलीस पाटील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. करोना काळात केलेल्या अतिरिक्त कामाचे मानधन अजूनही मिळालेले नाही, सणासुदीतही मानधन न मिळाल्याने पोलीस पाटलांमध्ये नाराजीचा सूर आहे. पोलीस पाटील संघटना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देत आहे. 2012 पासून प्रवासभत्ता मिळालेला नाही. सहा महिने झाले तरी मानधनाविना काम करावे लागत आहे. सणासुदीच्या काळात मानधन मिळायला हवे होते; पण ते मिळालेले नाही. त्यामुळे पोलीस पाटील काम कसे करणार?
– भगवानराव कारभारी, पोलीस पाटील, मत्रेवाडी, ता. कराड