मंचर – केंद्रातील आणि राज्यातील सरकारने मराठ्यांना आरक्षणाबाबत झुलवत ठेवण्याचे काम गेली अनेक वर्षे केले. आता मात्र मराठ्यांनी जागे होऊन झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारचा कडेलोट करावा, असे आवाहन राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि मराठा समाजाचे नेते अॅड सुनील बांगर यांनी केले.
मराठा आरक्षणासाठी सकल मराठा बांधव तसेच मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथे उपोषण स्थळापासून ते गणपती मंदिरापर्यंत सरकारच्या विरोधात कॅंडल मार्च काढून निषेध व्यक्त करण्यात आला. संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी सर्व राजकीय नेत्यांना मेंगडेवाडी गावात प्रवेश बंद केला असून हा लढा बळकट करण्याचा निश्चय ग्रामस्थांनी व्यक्त केला. या उपोषणाचा लढा हा साखळी पध्दतीने असणार आहे.
यापुढे याचे रूपांतर आमरण उपोषणसुध्दा होणार असल्याचे मराठा समाजाकडून सांगितले. यावेळी उपोषण स्थळापासून ते गणपती मंदिरापर्यंत सरकार विरोधात कॅंडल मार्च काढून निषेध व्यक्त केला आहे. यावेळी अकुश लांडे पाटील म्हणाले, मराठा समाज अतिशय मागासलेला असूनही मराठा आमदार खासदार हेच मराठा आरक्षणाला विरोध करत असल्याचा आरोप त्यांनी केला.