लोणी काळभोर – सिंघम पोलीस अधिकारी म्हणून नावलौकिक कमावलेल्या तत्कालीन पोलीस निरीक्षक सुहास गरुड यांच्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात बरेच आधिकारी आले व गेले; परंतु आपल्या कामाच्या पद्धतीचा न मिटणारा ठसा जो सुहास गरुड यांनी उमटवला, तसा ठसा उमटवण्याची कामगिरी करणे नंतरच्या दहा वर्षांतील एकाही अधिकाऱ्याला जमले नाही.
विद्यमान पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण हे 31 ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कुणाची नियुक्ती होणार हे अजून निश्चित झालेलं नाही. नवीन येणारे पोलीस निरीक्षक आपल्या कामगिरीने पोलीस ठाण्याचे नाव उज्जवल करावे अशी अपेक्षा आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून निवृत्त झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास गरुड 201-13 या कालावधीत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात प्रभारी म्हणून काम करीत होते. या कालावधीत सज्जनांचा पुरस्कार, दुर्जनांवर कायदेशीर वार ही त्यांच्या कामकाजाची पद्धत होती. त्यांची 2013 साली बदली झाल्यानंतर आलेल्या प्रत्येक पोलीस निरीक्षकाच्या कामगिरीची तुलना सुहास गरुड यांच्या कामगिरीशी केली जाते.
पुणे जिल्ह्यात 13 तालुके आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड शहरालगत असल्याने इतर बारा तालुक्यांच्या तुलनेत हवेली तालुक्यात नागरीकरणाचा वेग प्रचंड प्रमाणात आहे. नागरिकरणाचा वेग वाढल्याने येथील जमिनींचे बाजारभाव सोन्याच्या भावापेक्षा जास्त पटीने वाढले आहेत. परिणामी तालुक्यात सर्वत्र पैशाचा धूर निघत आहे. या पैशातून आलेली तकलादू श्रीमंती तरूणांना विचार करायला वेळच मिळू देत नाही.
महागडे मोबाइल, दुचाकी, चारचाकी वाहने, सोन्याचे दागिने, ब्रॅण्डेड कपडे, सेंट, परफ्यूमस, डिओडरंट, शॉपिंग मॉलमध्ये खरेदी, हिंदी, इंग्रजी चित्रपट पाहणे, मित्रांचे वाढदिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरा करणे, केक कापणे, वेगवेगळ्या प्रकारची दाढी वाढवणे, सोशल मिडियात वेगवेगळे फोटो टाकणे, डिजे तालावर बेधुंद नाचणे, व्यसनांचे सर्व प्रकार वारंवार करणे, भिन्न लिंगी व्यक्तीबरोबर प्रेम करणे या पलीकडे आजची तरुणाई जातच नाही. या तरुणाईला वठणीवर आणण्याच्या कामाला नवीन पोलीस निरीक्षकांना प्राधान्य द्यावे लागणार आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सध्या 21 गावे आहेत. पुणे शहराजवळ असलेल्या आणि ग्रामीण कूस बदलून शहरी तोंडवळा लाभलेल्या या गावांमध्ये गुन्हेगारीचा आलेख उंचावत आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्या अंतर्गत उरूळी कांचन, थेऊर व उरुळी देवाची या तीन ठिकाणी पोलीस चौकी आहेत. या तीनही चौक्यांच्या माध्यमातून या गावातील कायदा व सुव्यवस्थेचा कारभार हाकला जात आहे.
मात्र तरीही गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून मनुुष्यबळ अपुुुरे पडत आहे. या परिसरात शैक्षणिक संस्था, सदनिका आदींची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. त्यामुळे नागरिक पुणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच दळणवळणाच्या दृष्टीने सोयीच्या असलेल्या पूर्व हवेलीतील गावांमध्ये रहाण्यासाठी पसंती देत आहेत. या गावांत जमिनींच्या व्यवहारातील फसवणूक, गैरव्यवहार, खून, हाणामारी, महिलांवरील अत्याचार, वेगवेगळ्या प्रकारच्या चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत.
दखलपात्र मुद्दे
- अनेक गावांत जमिनींच्या व्यवहारातील फसवणूक
- गैरव्यवहार, खून, हाणामारी, महिलांवरील अत्याचार वाढले
- चोरीच्या घटनांत वाढ
वाहतूक अधिकारीही तत्पर हवा
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागातही एका कर्तव्य तत्पर आधिका-याची गरज आहे. धडाकेबाज निर्णय घेणारा आधिकारी वाहतूक शाखेत नियुक्त न केल्याने महामार्गावरील वाहतूक कोंडीमध्ये वाढ होत आहे. पुणे शहरातील वाहतूक कोंडी ठीक आहे; परंतु लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहतूक कोंडी खूपच वाईट आहे, असे मत सध्या वाहनचालक व्यक्त करत आहेत.
आव्हानांचा सामना
तुटपुंज्या मनुष्यबळासह पोलीस अधिकारी व कर्मचारी आपापले काम सध्या करत आहेत. सर्वच कर्मचारी वेगळ्या तणावाखाली काम करताना दिसत आहेत. त्यामुळे येथे नवीन येणाऱ्या अधिकाऱ्याला सर्वच अडचणींना तोंड देत आपल्या कामाचा ठसा उमटवण्याची आवश्यकता आहे.