फलटण – फलटण-पंढरपूर रेल्वे लवकरच धावणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विठ्ठलभक्तांची हाक ऐकली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिलेला शब्द पाळला आहे, असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
ते म्हणाले, देश स्वतंत्र झाल्यापासूनच फलटण-पंढरपूर रेल्वेमार्गासाठी अनेक नेते मागणी करत होते. जनतेच्या मला आशीर्वाद देऊन 2019 मला खासदारकीची संधी दिली. खासदारकीची शपथ घेतल्यापासून मी हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले. आज त्याला यश आले. दि. 31 जानेवारीला रोजी केंद्र आणि राज्य शासनाच्या एकूण निधीपैकी राज्य शासनाने 50 टक्के निधीची तरतूद केली होती. आता दि. 10 ऑक्टोबरला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रकल्प केंद्र सरकारने सुरू करावा, असा ठराव मंजूर केला आहे.
विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरून येणारे वारकरी, भक्त, शेतकरी, उद्योजक आणि व्यापाऱ्यांना हा रेल्वेमार्ग फायदेशीर ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या कामात लक्ष घातले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यामुळे कामाने वेग घेतला. मी सातत्याने पाठपुरावा केल्याने, फलटण-पंढरपूर हा 105 किमीचा रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयाकडून पूर्ण करण्यात येणार आहे. हा विषय मार्गी लावण्यासाठी मी रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन पत्र दिले होते.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा मार्ग रेल्वे मंत्रालयाकडून पूर्ण करण्यात येणार असल्याचा ठराव केला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सर्व मंत्री, प्रशासकीय अधिकारी, भाजपचे वरिष्ठ नेते, शिवसेना पदाधिकाऱ्यांचे माढा मतदारसंघातील जनतेच्यावतीने मी अभिनंदन करतो. हा रेल्वेमार्ग लवकरच पूर्ण होऊन, विठ्ठलभक्तांचे स्वप्न सत्यात येईल.