सातारा – सातारा पालिकेच्या भुयारी गटार योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या शहरालगतच्या करंजे येथीस सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे काम पूर्णत्वाला गेले आहे. या प्रकल्पात भुयारी गटार योजनेतील शहराच्या पश्चिम भागातील सांडपाण्याचे शुद्धीकरण येथे केले जाणार आहे. तब्बल 55 लाख लिटर पाण्यावर ही प्रक्रिया केली जाणार असून येथील क्षेत्रात हा प्रकल्प साकारला जात आहे. या प्रकल्पाचे काम मार्च 2024 पर्यंत पूर्णत्वाला जाणार असून शहराचे सांडपाणी कोणतेही प्रदूषण करणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
पालिकेची स्थापना झाल्यापासून शहरात सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प भौगोलिक मर्यादांमुळे करता आला नाही. शहराचे सुमारे 80 टक्के सांडपाणी गटाराने ओढे व नाल्यांमधून वाहून जात नदीला जाऊन मिळत आहेत. या सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी पालिकेने भुयारी गटार योजना हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. आरएस इन्फ्रा या कंपनीच्या माध्यमातून शहरात या योजनेचे काम पूर्णत्वाला जात आहे. भुयारी गटार योजनेच्या माध्यमातून पाण्याचे व्यवस्थापन करण्याकरता 212 चेंबर बांधण्यात आले आहेत. हे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. करंजे येथे 55 लाख लिटर क्षमतेची सांडपाणी प्रकल्प टाकी बांधण्यात येत असून येथे सांडपाण्यातील दूषित घटक बाजूला करून त्या पाण्याचा पुनर्वापर करता येईल या पद्धतीने नियोजन केले जाणार आहे.
शहराचा पश्चिम भाग या प्रकल्पात जोडला जाणार असून टप्प्याटप्प्याने हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. शहरात सुमारे 32 किलोमीटरच्या क्षेत्रात भुयारी चेंबरचे काम पूर्णत्वाला नेले आहे. पुढील टप्प्यात घरातील चेंबर गटार योजनेला जोडले जातील. सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची आखणी करून हे पाणी करंजे येथील टाकीत आणले जाईल. तसेच त्यावर वैशिष्ट्यपूर्ण प्रक्रिया केली जाणार आहे. या ठिकाणी एक लाख 40 हजार लिटर क्षमतेचे दोन पंपिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. शहराचे सांडपाणी एकत्र करून त्या पाण्यावर प्रक्रिया होणार आहे. त्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल या पद्धतीने हा प्रकल्प राबवणार असून त्या पाण्याचा वापर झाडांसाठी आणि सातारा शहरातील बागांसाठी केला जाईल, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली आहे.