सातारा – पुणे – बंगळुरू महामार्गावरील आनेवाडी आणि तासवडे टोल नाक्यावर अन्यायकारक टोल वसुली सुरू आहे. या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील वाहनांना टोल माफी झालीच पाहिजे या मागणीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाने आनेवाडी टोलनाक्यावर आक्रमक होत सुमारे अर्धा तास ठिय्या मांडला.
शिवसैनिकांच्या या आंदोलनामुळे महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्याने आठ दिवसात तोडगा काढण्याच्या आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले आहे. मात्र, आठ दिवसात यावर तोडगा न निघाल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिला आहे.
जिल्ह्यातून पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग 121 किलोमीटरचा जातो. या मार्गावर सातारा जिल्ह्यात आनेवाडी आणि तासवडे येथे दोन टोलनाके आहेत. साताऱ्याच्या नागरिकांना जिल्हा अंतर्गत कुठेही जायचे झाल्यास अगदी कमी अंतराचा प्रवास करायचे म्हटले तरी टोलची रक्कम भरावी लागते.
ही सातारकर नागरिकांची एक प्रकारची लूट आहे. या कारणाने नागरिक व टोल प्रशासनात वारंवार वाद होतात. ही मागणी घेऊन उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता ठिया आंदोलन केले.
या आंदोलनाच्या दरम्यान कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवसैनिकांनी टोल नाक्यावर घोषणा देत अन्यायकारक टोलमाफी झालीच पाहिजे, अशी नारेबाजी केली. आनेवाडी टोलनाक्याच्या दोन्ही बाजूला शिवसैनिकांनी ठिय्या मांडला टोल माफी दिल्याशिवाय मागे फिरणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला.
यावेळी भुईंज आणि सातारा तालुका पोलिसांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र मागणी मान्य झाल्याशिवाय माघार घेणार असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले. या आंदोलनात अर्धा तास गेला यामुळे महामार्गावरील सहा लाईनवरील वाहतूक थांबली. परिणामी वाहनांच्या सुमारे एक किलोमीटर लांब रांगा लागल्या प्रवाशांचा खोळंबा झाला. शिवसैनिक मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. संबंधित कंपनीचे अधिकारी तेथे येऊन त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला याबाबत त्वरित बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले.
या आंदोलनाप्रसंगी जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, यांच्यासह जिल्हा समन्वयक रामदास कांबळे, ज्येष्ठ नेते सुधीर राऊत, युवा सेना जिल्हाप्रमुख माऊली पिसाळ, अजित यादव, विश्वनाथ धनवडे, निमिश शहा, सागर रायते, नितीन गोळे, सचिन झांजुर्णे, गणेश जाधव, रियाज शेख, इमरान बागवान, सागर धोत्रे, तेजस पिसाळ, विलास भणगे, राजाभाऊ गुजर, माऊली शेलार, माऊली गोळे, संतोष चव्हाण,
शिवराज टोणपे, बापू गाढवे, रुपेश वंजारी, हरी पवार, इम्रान बागवान, अनिल गुजर, रिजाज शेख, सादिक बागवान, सागर धोत्रे, तेजस पिसाळ, विलास भणगे, संदीप साळवे, सागर कदम, प्रणव सावंत, अतिस ननावरे, रवी भणगे, निलेश चव्हाण, आकाश पवार इत्यादी उपस्थित होते.