सातारा – आज प्रत्येक जण म्हणतोय, आम्ही इतके. आम्ही एवढे. हे टाळायचे असेल आणि सर्वांना न्याय, अधिकार मिळायचा असेल तर जातीनिहाय जनगणना आवश्यक आहे. ती झाली की देऊन टाका ज्याचं त्याला जे पाहिजेलं ते. कशाला वाद. मी हात जोडून सगळ्यांना विनंती करतो, काय ते प्रश्न मिटवा, नाही तर देशाचे तुकडे होतील. वाट लागायला वेळ लागणार नाही, अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी जलमंदिर येथे नोंदवली. मराठा आरक्षणासाठी दौऱ्यावर असणारे मनोज जरांगे- पाटील यांच्या भेटीनंतर जलमंदिरात प्रसारमाध्यमांशी उदयनराजे बोलत होते.
यावेळी मनोज जरांगे यांच्यासह इतर मराठा बांधव उपस्थित होते.उदयनराजे म्हणाले, “”छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही भेदभावाला थारा दिला नाही. मनोज जरांगे आज राज्यात फिरत आहेत. का फिरत आहेत, कशासाठी फिरत आहेत, कशामुळे ही वेळ आली, याचा विचार प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. मी कुणाचेही समर्थन करत नाही. मनोज जरांगे आरक्षणासाठी मरायला तयार झालेत. का, कशासाठी? का तर अन्याय झालाय म्हणून. जनगणना करा. कोणावरही अन्याय करु नका, असे माझे म्हणणे आहे. जनगणना करा आणि आवश्यक आहे, त्याला आरक्षण द्या. मी मराठा म्हणून बोलत नाही.
आज सगळेजण गुणवत्तेबाबत विचार करु लागला असून मलाही वाटते गुणवत्तेवर आधारित आरक्षण असावे. प्रवेशावेळी प्रत्येक ठिकाणी जातीजातीचा विषय निघतो. जातीय तेढ कशामुळे आणि कुणामुळे वाढलीय, याचा शोध प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे.” प्रश्न सोडवणार नसाल तर माणसाने जगायचे कसे, असा सवालही यावेळी उदयनराजे यांनी उपस्थित केला. जरांगें ओबीसीमधील आरक्षणासाठी आग्रही आहेत, या विचारलेल्या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, “”माझं तर म्हणणे आहे जनगणना करा आणि देऊन टाका ज्याला पाहिजे त्याला. प्रत्येकाला जगण्याचा, चांगले शिक्षण घेण्याचा अधिकार आहे.
तो मिळालाच पाहिले.” आणि त्यासाठी जातीनिहाय जनगणना आवश्यक असल्याचे मत त्यांनी पुन्हा एकदा मांडले. याचदरम्यान त्यांनी हात जोडत सर्वांना विनंती केली. विनंती करताना, हात जोडतो, काय ते प्रश्न एकदा मिटवा. नाहीतर देशाचे तुकडे होतील, वाट लागायला वेळ लागणार नाही, असे वक्तव्यही त्यांनी यावेळी केले.
महाराजांनी आशीर्वाद दिला ः जरांगे
गांधी मैदानावरील सभा संपल्यावर मनोज जरांगे पाटील यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या “जलमंदिर’ या निवासस्थानी जाऊन उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी जलमंदिराचा परिसर गर्दीने भरून गेला होता. भवानी मातेचे दर्शन घेऊन श्री.जरांगे यांनी उदयनराजे यांची भेट घेतली. त्यावेळी जरांगे यांच्या कानात उदयनराजे बोलत होते. त्यानंतर पत्रकारांनी जरांगे पाटील यांना “उदयनराजे यांनी काय कानमंत्र दिला,’ असे विचारले. महाराजसाहेबांनी मला आशीर्वाद दिला, असे उत्तर जरांगे यांनी दिले. काय आशीर्वाद दिला, असे विचारताच “आशीर्वाद काय ते सांगायचे नसते, असे उत्तर त्यांनी दिले.