पाचगणी – महाराष्ट्राच्या मातीत शौर्य आहे आणि हेच शौर्य मराठ्याच्या तलवारीच्या पात्याला लागलं की इतिहास घडतो हे देशाला माहीत आहे. कोणीही कितीही जंग जंग पछाडूदे, मराठा आरक्षणाची लढाई मी जिकणार. मराठ्याच्या मुखाशी आरक्षणाचा घास आलेला आहे. मराठ्यानी संयम ठेवावा. आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे सरत नसतो, अशी ग्वाही मनोज जरांगे पाटील यांनी आज मेढा येथील सभेत दिली.
ते म्हणाले, “”कुणबी हा शब्द शेतात राबणारा मराठा म्हणून महाराष्ट्रात लागू झाला आहे. वर्षानुवर्षे शेतात राबणारा मराठा समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल असताना त्या मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवायच काम कोणी केलं याचा विचार मराठ्यानी करावा. वर्षानुवर्षे नेत्यांचे पाय चाटत मराठ्यांनी स्वाभिमान गहाण ठेवला. मात्र, आता मराठा आपल आरक्षण घेणारच.” कोणीही कितीही जातीय दंगल करवण्याचा प्रयत्न केला तरी मराठ्यानी ती भडकवू द्यायची नाही, ही जबाबदारी मराठ्यांच्या खाद्यावर आहे, असे भावनिक आवाहन जरांगे पाटील यांनी केले.
मराठ्यांना दंगलीत अडकवून कायदा न होऊ देणे हा काही विघातक शक्तीचा डाव वेळीच मराठ्यांनी ओळखून सयंम पाळा. मी आपल्याला आरक्षण मिळवून देतो, असे सांगत मराठा आरक्षणाची लढाई जिकणारच, असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांना सकल मराठा समाजाकडून तलवार देत त्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. मेढा नगरी भगवामय होऊन झालेला माहोल मराठामय झाल्याचं चित्र दिसत होते. “एक मराठा लाख मराठा’ च्या घोषणेने मेढ्याचा आसंमत दुमदुमून गेला होता.