फलटण – अमर्याद गर्विष्ठ आणि प्रचंड अहंकारी असलेला खासदार तुम्ही परत निवडून देणार असाल, तर तुमचा ‘गिरवी’चा ‘आगवणे’ झाल्याशिवाय राहणार नाही. कोणत्याही परिस्थितीत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीत उभे करणारच आहोत. संजीवराजेंना उमेदवारी नाही मिळाली, तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनासुद्धा मिळू देणार नाही, असा निर्धार विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
फलटण येथे गुरुवारी झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. आमदार दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक अनिकेतराजे नाईक निंबाळकर, मनोज पोळ, सुरेंद्र गुदगे, बाळासाहेब सोळसकर, मंगेश धुमाळ, रमेश धायगुडे उपस्थित होते. रामराजे म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत कोणती भूमिका घ्यायची, यासाठी घेण्यात आलेल्या या मेळाव्याच्या फलकावर कुठल्याही नेत्याचा फोटो नसल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती; परंतु तुमच्या सर्वांच्या परवानगीनेच अजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय आपण घेतला. मेळाव्यात आपण काय बोललो, तर ते अडचणीत येऊ नयेत म्हणूनच फलकावर अजितदादा, सुनील तटकरे यांचे फोटो टाकले नाहीत. पाणीदार खासदार म्हणून मिरवणार्या रणजितसिंह यांनी फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारल्या आहेत. रेल्वे आणली म्हणून तुम्ही छाती पिटताय. तुमची रेल्वे रिकामी, त्याला मी काय करू? या पट्ट्याने मोदींना अडवले म्हणून धोम-बलकवडीचे पाणी आले. कोणत्याही परिस्थितीत संजीवराजे यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उभे करणारच आहोत.
संजीवराजे म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीतील भूमिका ठरवण्यासाठी हा मेळावा घेण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांत राजकीय भूमिका बदलत गेली. सातारा, सांगली, सोलापूर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जात होते. अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय आ. रामराजे, आ. चव्हाण यांच्यासह अनेक आमदांरानी घेतला. विकासकामे मार्गी लागावीत, याच प्रमुख उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला. आ. रामराजे यांनी अपक्ष आमदारांच्या मदतीने कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना करण्यास तत्कालीन युती सरकारला भाग पाडले होते. म्हणूनच आपण आपले पाणी राखू शकलो. त्यातून नीरा-देवघर, धोम-बलकवडी हे प्रकल्प उभे राहिले. आज वेगळे राजकारण सुरू आहे. दबाव टाकून हवे ते करून घेतले जात आहे. ही प्रवृत्ती थांबवायलाच हवी. यावेळी आ. चव्हाण, बाळासाहेब सोळसकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे, माजी सदस्य दत्ता अनपट, मंगेश धुमाळ, रमेश धायगुडे, सुरेंद्र गुदगे यांनी संजीवराजेंना उमेदवारी मिळावी, असे मत व्यक्त केले. त्यांना उमेदवारी मिळाली नाही, तरी त्यांनी उभे राहावे. त्यांना प्रचंड मतांनी विजयी करू, अशी ग्वाही या नेत्यांनी दिली.