सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात करोनाबाधितांचे प्रमाण वाढत आहे. संसर्ग कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रभावीपणे काम करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला.
करोना संसर्ग नियंत्रणासाठी उपाययोजना राबविण्याबाबत जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजकुमार बन्सल, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील, सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण भागात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी ग्रामदक्षता समित्या प्रभावीपणे कार्यान्वित करा. मंगल कार्यालये, हॉटेल्स, मोकळ्या जागांवर लग्न समारंभ होत आहेत. या समारंभांमध्ये शासनाच्या नियमांचे पालन होते का, ते पहावे. नियमांचे पालन होत नसेल, तर कारवाई करावी. करोनाचे 15 पेक्षा जास्त रुग्ण आढळलेल्या ठिकाणी मायक्रो कन्टेनमेंट झोन जाहीर करावेत. करोनाची लक्षणे असलेले रुग्ण आल्यास खासगी डॉक्टरांनी त्याना तात्काळ करोना टेस्ट करून घ्यायला सांगावे. प्रत्येक तालुक्यातील खासगी डॉक्टरांच्या बैठका घ्याव्यात.
मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईची मोहीम प्रभावीपणे राबवावी. हॉटेलचालकांना 50 टक्के ग्राहकांच्या अटीवर हॉटेल सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्याचे पालन होते का आणि वेळेचे बंधन पाळले जाते का, याकडे पोलिसांनी लक्ष ठेवावे. गृह विलगीकरणात असलेले रुग्ण प्रशासनाच्या नियमांचे पालन करतात का, याकडे आरोग्य विभागाने लक्ष द्यावे. नियम न पाळणाऱ्यांना संस्थात्मक विलगीकरणात दाखल करावे, अशा सूचना सिंह यांनी दिल्या.