सातारा – महाबळेश्वर येथील अतिक्रमणावर पुुन्हा दोन दिवसांत कारवाई केली जाणार आहे. कोणतेही नवीन अतक्रिमण होणार नाही, याची आम्ही दक्षता घेत आहोत. कोणी जर नव्याने बांधकाम करत असेल तर त्यांनी ते करु नये. आताच थांबवावे, अशी विनंती करतो. त्यांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावे. अन्यथा आम्हाला कडक कारवाई करावी लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी जितंेद्र डुडी यांनी दिला.
सातारा जिल्ह्यात नव मतदार नोंदणी अभियानाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे २२ जानेवारीपर्यंत आपली नोंदणी नव मतदारांनी करुन घ्यावी, यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, महाबळेश्वर येथील अतिक्रमण प्रश्नी मी पुन्हा विनवनी करणार नाही. त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसांनंतर कारवाई करण्यात येईल. आतापर्यंत अतिक्रमण करणाऱ्यांना आम्ही खूप संधी दिली आहे. आता त्यावरही लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. त्याबाबतच्या तशा सूचना सातारचे प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांना दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात जास्तीत जास्त १०० टक्के मतदान झाले पाहिजे, यासाठी आमचा प्रशासन म्हणून प्रयत्न सुरु आहे. गतवेळच्या गडचिरोली जिल्ह्याचा रेकॉर्ड साताऱ्याला मोडायचा आहे, असा संकल्प जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे. दरम्यान, २०१९ आणि आताच्या तुलनेत नवमतदार नोंदणी मोठ्या संख्येने होत आहे. त्याच पद्धतीने जे दुबार मतदार आहेत, मृत मतदार आहेत. त्यांची नोंदणी रद्द केलेली नोंदणी सुमारे दीड लाख आहेत, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी म्हणाले, नवमतदार नोंदणी अभियान सुरु आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यात मतदार नोंदणी अधिकारी ८, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी १२ असून पूर्ननिरीक्षक कार्यक्रम दि. २७ ऑक्टोबरला राबवण्यात आला होता. जिल्ह्यात सध्या पुरुष मतदार १२ लाख ९९ हजार ३२, महिला मतदार १२ लाख ५० हजार ७०५, तृतीयपंथी ८९ असे एकूण २५ लाख ४९ हजार ८२६ मतदार आहेत. सेना दलातील १२ हजार ७८५ मतदार आहेत. नवमतदार नोंदणी जास्तीत जास्त करण्यात यावी, यासाठी आम्ही जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ज्यांचा जन्म २००४-०५ ला झालेला आहे, अशा सर्वांची यादी काढण्याचे आदेश दिले गेले आहेत.
त्यांची नोंदणी कशी करता येईल, याकरता विशेष सुचना गावच्या तलाठी, ग्रामसेवक यांना दिलेल्या आहेत. जास्तीत-जास्त मतदान कसे करता येईल. या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत. गतनिवडणूकीत गडचिरोली जिल्ह्याने सर्वात जास्त मतदान करण्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. यावेळी सातारा जिल्ह्याचा पहिला क्रमांक येण्यासाठी १०० टक्के कसे मतदान होईल, याकरता आमचा प्रयत्न राहणार आहे.
एसटी अधिकाऱ्यांसमवेत २९ रोजी बैठक
शहरातील वाहतूकीची समस्याबाबत पेपरमध्ये वाचतो आहे. वाहतूक कोंडी सोडवता येईल, यासाठी मी आणि पोलीस अधीक्षक समीर शेख आम्ही संयुक्तपणे पाहणी करतो. तसेच एसटीच्या अधिकाऱ्यांच्यासोबत दि.२९ रोजी बैठक आयोजित केली आहे. त्या बैठकीत मी स्वत: आढावा घेवून यामध्ये काय सुधारणा करता येतील ते पाहणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
सध्या पाण्याची टंचाई नाही
जिल्ह्यातील दुष्काळाच्या अनुषंगाने विचारले असता पाण्याचे नियोजन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. सध्या कोणतीही टंचाई नसून ज्या प्रकल्पांचे काम सुरु आहे. ते पुर्ण कसे करता येईल हे आमचे उद्धीष्ट आहे. चारा डेपोबाबत दोन प्रस्ताव पाठवले असून जेथे गरज आहे त्याचेच प्रस्ताव दिले गेले आहेत, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.