सकल मराठा समाजाच्या निर्णयासोबत राहणार
सातारा (प्रतिनिधी) – कोपर्डीची घटना घडली आणि संपूर्ण मराठा समाज पेटून उठला. मराठा समाजाच्या मागण्या व आरक्षणासाठी मूक मोर्चे निघाले. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली, ही बाब दुर्दैवी आणि समाजासाठी अन्यायकारक आहे. मराठा आरक्षणासाठी समाज जे पाऊल उचलेल, ते सर्वांना मान्य असेल. समाज घेईल त्या निर्णयाशी समाजबांधव म्हणून मी बांधील आहे. ही स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने लवकर हालचाल करावी, अशी सर्वांची अपेक्षा आहे. मराठा आरक्षणासाठी प्रसंगी पुन्हा रस्त्यावर उतरुन आंदोलन करू, असा इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीबाबत प्रसारामध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. उच्च न्यायालयात जो निर्णय होतो. तो सहसा सर्वोच्च न्यायालयात बदलत नाही; परंतु मराठा आक्षणाबाबत असे का घडले, हा प्रश्न आहे. सरकारने आपली बाजू नीट मांडली नाही, असेच म्हणावे लागेल. हे सरकार नवीन आहे. मराठा समाजाने आरक्षणासाठी लढा उभारला, मोर्चे काढले.
एवढे सगळे करून आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळत असेल, तर ती दुर्दैवी बाब आहे. ही स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर प्रयत्न करावेत. इतर समाजांचे आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी नाही आणि तसे घडतही नाही. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याचा प्रश्न नाही, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले. दरम्यान, राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष घालून आरक्षणावरील स्थगिती उठवली पाहिजे, ही सकल मराठा समाजाची अपेक्षा आहे. मराठा समाज फार मोठा आहे. या समाजातील असंख्य लोक आर्थिकदृष्ट्या मागास आहेत. समाजाच्या अनेक अडचणी असून त्यासाठी आरक्षण आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.