मायणीत नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया; पंढरपूरकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद
मायणी (प्रतिनिधी) – मल्हारपेठ- पंढरपूर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. नवीन पूल तयार करण्याच्या प्रक्रियेमुळे मायणी येथील चांद नदीच्या तीरावर दोन्ही ठिकाणी तयार केलेले पर्यायी मातीचे पूल मजबूत न बांधल्यामुळे व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे खचल्यामुळे पंढरपूर, म्हसवड, आटपाडी या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मल्हारपेठ- पंढरपूर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम मायणी येथे सुरू आहे. गावाच्या पूर्व- पश्चिम दोन्ही बाजूला गावात प्रवेश करताना चांद नदीचे पात्र आहे. रस्त्याच्या रुंदिकरणात या दोन्ही ठिकाणी नदीपात्रावर जुना पूल पाडून नवीन पूल बांधण्याचे काम सुरू आहे. या पुलाला पर्यायी पूल म्हणून ठेकेदाराने माती व मुरुम टाकून पर्यायी पूल तयार केले होते. मात्र, मायणीच्या धरण परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून सातत्याने पर्जन्यवृष्टी होत आहे. मायणीचा ब्रिटीशकालीन तलाव यापूर्वीच भरून वाहू लागला होता. तो पुन्हा अधिक वेगाने भरून वाहू लागल्याने चांद नदीचे पात्र मोठ्या प्रवाहाने वाहू लागले. परिणामी पाण्याच्या प्रचंड दाबामुळे तयार केलेले दोन्ही बाजूचे पर्यायी पूल वाहून गेले. केवळ ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही बाब घडली असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.
या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम तीन-चार महिन्यांपासून सुरू आहे. गावामध्येदेखील काही बाबींमुळे गावातील रस्ता रुंदीकरणाचे काम रेंगाळले आहे. मात्र, गावाच्या दोन्ही बाजूला चांद नदीच्या पात्रावरील नव्याने बांधावयाच्या पुलाचे काम रेंगाळण्याचे काहीच कारण नव्हते. म्हसवडवरून येणाऱ्या बाजूला असलेल्या नदीपात्रावर नवीन पुलाच्या बांधकामास प्रारंभदेखील झाला होता. तेथे लोखंडी सळ्या वगैरे टाकून फाऊंडेशन तयार करण्याचे काम सुरू होते. मात्र, महिना-दीड महिन्यांपासून हे काम बंद आहे.
काम गतिने झाले असते तर आज ओढवलेला प्रसंग निश्चित टळू शकला असता. नदीचे मोठे पात्र व भोवती तयार केलेल्या मातीच्या पर्यायी पुलामध्ये पूर्वेकडील बाजूस फक्त एक पाईप टाकली होती. तर पश्चिमेकडील बाजूच्या पर्यायी पुलामध्ये केवळ दोन पाईप टाकण्यात आल्या होत्या. याठिकाणी किमान चार ते पाच पाईप टाकल्या असत्या तर पाणी त्या पाईपमधून वाहून जाऊ शकले असते. हा पर्यायी पूल केवळ मुरुम व माती यांनी तयार करण्यात आला होता. यामध्ये दगड, वाळूची भर घातली असती तर तो भक्कम झाला असता. मात्र, ठेकेदाराने या दोन्ही बाबतीत हलगर्जीपणा दाखविल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याची तक्रार लोक करत आहेत. सकाळच्या वेळी पूल खचल्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र, रात्रीच्या वेळी हा पूल खचला असता तर मोठा अनर्थ झाला असता.
पूल मजबूत करण्याची गरज
पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने याठिकाणी दुरुस्ती करणेदेखील अवघड होणार असले तरी अजूनदेखील ठेकेदाराने तातडीने या दोन्ही पुलांच्या ठिकाणी मोठ्या व्यासाच्या पाच ते सहा नळ्या टाकून दगड, मुरूम, वाळू भरून हा पूल मजबूत करणे गरजेचे आहे. या दोन दिवसात आणखी पाऊस पडल्यास उर्वरित पूलही वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.