सातारा – पुसेसावळी, ता. खटाव येथील घटनेनंतर प्रशासनाने जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत गांभीर्याने हाताळत, अत्यंत जलदगतीने कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करून, शांतता अबाधित राखली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक घटकाच्या सुरक्षितेतेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, ठाणे अंमलदार यांच्याशी देसाई यांनी हॉटलाइनवरून संवाद साधला. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते. देसाई म्हणाले, पुसेसावळीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिस व प्रशासनाने सर्व घटनांवर बारकाईने लक्ष ठेवावे. तलाठी आणि कोतवालांमार्फत गावागावांत शांततेचे आवाहन करावे.
अफवा पसरून कोणतीही अनुचित घडना घडू नये, याची खबरदारी घ्यावी. जिल्ह्यात 144 कलम लागू असून कोणालाही मोर्चे, निदर्शने करता येणार नाहीत; पण आलेल्या प्रतिनिधींची निवेदने यंत्रणांनी स्वीकारावीत. जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना ककराव्यात. सामान्य नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तांच्या सुरक्षितेसाठी पालकमंत्री या नात्याने मी स्वत: आणि जिल्हा व पोलीस प्रशासन आवश्यक उपाययोजना करत आहे.
दरम्यान, मुंबईतील महत्त्वाच्या बैठका रद्द करून पालकमंत्री जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून प्रशासनाला योग्य त्या सूचना देत आहेत. कोणतीही अडचण असल्यास प्रशासनाशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. पोलीस आणि प्रशासनाने गावपातळीपर्यंत सलोखा समित्यांच्या बैठका घ्याव्यात. समाजातील विविध वर्गातील नागरिकांना या बैठकांमध्ये बोलवून, प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांची माहिती द्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.