सातारा – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा आगारातील काही बसेस वेळेच्या अगोदर धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे एसटी प्रवाशांच्या की चालकांच्या सेवेसाठी असा प्रश्न आता प्रवाशांना पडला आहे. सातारा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज असून प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या चालकांवर कारवाई करावी, अन्यथा जनआंदोलनाची भूमिका प्रवाशांना घ्यावी लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
परिवहन महामंडळाच्या नियमानुसार नियोजित वेळेच्या अगोदर एसटी बस संबंधित मार्गावर धावणे हे चुकीचे आहे. मात्र या प्रकाराला सातारा आगारातील चालक व वाहकांना कोलदांडा दाखवला असून त्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत असल्यानेच चालक व वाहकांचे चांगलेच फावले आहे. प्रवाशांना मात्र दररोज गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे..एसटीच्या प्रचलित नियमानुसार फिक्स ड्यूटीसाठी कोणत्याही चालकांचा वापर करू नका, असा महाव्यवस्थापकांचा फतवा असतानाही सातारा आगारासह विभागातील अन्य आगारात त्याचे पालन केले जात नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सातारा विभागात चालकाला एकाच ड्यूटीसाठी वापर केला जात असल्याचे दैंनदिन रोजनिशीवरून पहावयास मिळत आहे. त्यामुळे सातारा आगारातील बहुतांश चालकांचा मनमानी कारभार सुरू आहे.
सातारा आगारातील बहुतांश चालकांकडून बोरीवली, मुंबई ड्यूटी लावली जात असल्याचा प्रकार घडत असल्याने याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. शिवशाही बस चालविण्याचे प्रशिक्षण कित्येक चालकांनी घेतले आहे मात्र त्या चालकांना शिवशाहीसाठी ड्यूटी लावली जात नाही. मात्र ज्याचे शिवशाहीचे प्रशिक्षण झाले नाही त्या चालकांना सर्रास शिवशाहीची ड्यूटी लावली जात असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. मात्र त्या चालकांकडून एखादा गंभीर अपघात झाल्यास ड्यूटी लावणारे अधिकारी जबाबदारी स्विकारणार का? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. एसटी महामंडळाने लाखो रूपयांचा खर्च शिवशाही प्रशिक्षणासाठी केला आहे. मात्र त्याचा काहीच उपयोग सातारा आगारात झालेला नाही. प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या तसेच मनमानी पध्दतीने प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या चालकांवर आणि त्यांना सांभाळून घेणाऱ्या अधिकाऱ्यावर विभाग नियंत्रकांनी कारवाई करावी अन्यथा प्रवाशांना जनआंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.