केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांची उपस्थिती; दोन कोटींच्या विकासाकामांचे भूमिपूजन
पुसेसावळी – ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम गोरेगाव वांगी, ता. खटाव येथे मंगळवार, दि. 9 रोजी होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा उपस्थिती राहणार आहेत, अशी माहिती वर्धन अॅग्रोचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम यांनी दिली. दरम्यान, गावात दोन कोटी 15 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन यावेळी होणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या संकल्पनेतून ‘शासन आपल्या दारी दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमातून प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार लाभार्थ्यांना एकाच छताखाली लाभ देण्याचे ध्येय आहे. गोरेगाव वांगी येथे मंगळवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सरकारी विभाग व महामंडळांच्या योजनांच्या माहितीचे स्टॉल, सामाजिक उत्तरदायित्व योजनेंतर्गत गरजूंना वैयक्तिक लाभ, नवमतदार नोंदणी आणि इतर लोकाभिमुख योजनांचा लाभ केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.
गोरेगाव वांगी ते पुसेसावळी रस्ता, बंदिस्त गटार, रामोशी समाजासाठी सभागृह बांधणे, गोरेगाव वांगीतील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण, या कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन होणार आहे. याबरोबरच असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वेताळनाथ मंदिरात आयोध्येतील अभिमंत्रित अक्षता आणि प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमंत्रण पत्रिकांचे वाटप होणार आहे.
या कार्यक्रमास खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार नरेंद्र पाटील, मदन भोसले, सातारा लोकसभा मतदारसंघ प्रभारी अतुल भोसले, भाजप प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, कराड उत्तर निवडणूकप्रमुख मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, भीमराव पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे, जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, कृषी विकास अधिकारी विजय माईनकर, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर,
तहसीलदार बाई माने, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, कृषी अधिकारी राहुल जितकर, शासकीय अधिकारी आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती धैर्यशील कदम यांनी दिली. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमामुळे नागरिकांच्या वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. या उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन विक्रमशील कदम यांनी केले.