पिंपरी – मराठी चित्रपट सृष्टीत अनेक दर्जेदार कलाकार तयार झाले आहेत. त्यांनी आपली पत कायम राखली. सध्या कलाकार एकमेकांमेकांची नावे व्यवस्िथतपणे घेत नाहीत. एकमेकांना सन्मान देत नाहीत. त्यामुळे त्याची पत राहत नाही. कलाकारांनी एकमेकांना सन्मान द्या अन् दुसऱ्याचा मान ठेवा, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी मराठी कलाकारांना दिला.
शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात राज ठाकरे यांची ‘ नाटक आणि मी’ या विषयावर मुलाखत झाली. यावेळी ते बोलत होते. अभिनेते दीपक करंजीकर यांनी ठाकरे यांच्याशी संवाद साधला. यावेळी १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सचिन इटकर आदि मान्यवर उपस्थित होते.
राज ठाकरे म्हणाले की, पूर्वीच्या काळी मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीत अनेक सुपरस्टार होते. मात्र आता केवळ कलाकार राहिलेले आहेत. मराठी कालाकार एकमेकांशी बोलताना टोपण नावाने हाक मारतो. तुम्ही एकमेकांना मान दिला नाही तर प्रेक्षक तुम्हाला मान कसा देतील, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच एकमेकांना मान दिला तर मराठी रंगभूमीला चांगले दिवस येतील. नाटक न पाहीलेला मराठी माणूस सापडणे अवघड आहे. मराठ्यांचा इतिहास पाहिला तर तो नाटक ते अटक असा आहे. महाराष्ट्राने नेहमीच देशाचे नेतृत्व केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इथेच मोठे झाले. आपण राज्यकर्ते होतो पण आपण आपला इतिहास विसरत चाललो आहोत. शंभर फोटो इथे लागले आहेत त्यांना आजची अवस्था बघितल्यावर काय वाटत असेल?
जाती-पातीच्या राजकारणात अडकू नका
सध्या राज्यात जाती पातीचे राजकारण सुरू आहे. त्यामध्ये मराठी माणसाने अडकु नये असे राज ठाकरे यांनी सांगितले. ओबीसी विरोधात मराठा समाजाला लढविले जात आहे. मराठी समाज एक राहू नये यासाठी कोणती तरी शक्ती काम करत असल्याचे ठाकरे म्हणाले. त्यामुळे यामध्ये न पडता काम करावे असे ठाकरे म्हणाले.