पुणे – पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाचे विस्तारीकरणाचा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतला आहे. त्यानुसार द्रुतगती महामार्ग सहा पदरीऐवजी आठ पदरी करण्यात येणार आहे. सुमारे ७० किलोमीटर लांबीच्या आठ पदरीकरणासाठी १०० हेक्टर जागेची आवश्यकता आहे. या प्रकल्पास मान्यता देण्याचा प्रस्ताव एसआरडीसीने तयार करून शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर द्रुतगती महामार्गाची क्षमता वाढणार असून वाहतूक कोंडीचा प्रश्न दूर होणार आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरून दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. द्रुतगती महामार्गावरून दररोज सुमारे दीड लाख वाहने धावतात. सद्यस्थितीत द्रुतगती महामार्ग सहा पदरी आहे. महामार्गावर वाहनांची वाढती वर्दळ आणि आता अपुरा पडणारा मार्ग यामुळे या महामार्गाचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव एमएसआरडीसीने तयार केला आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग हा सुमारे ९४ कि.मी लांबीचा आहे. आता महामार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील १३.३ किलोमीटच्या पर्यायी रस्ता अर्थात मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम गतीने सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत १.६७ किलोमीटर आणि ८.९२ किलोमीटर लांबीचे दोन बोगदे असून या दोन्ही बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे.
तर आशिया खंडातील सर्वात मोठा उभारण्यात येणारा दरी पूलाचे काम वेगाने सुरू आहे. खालापूर टोल ते खोपोली एक्झिटपर्यंत आठ पदरी रस्ता तयार करण्यात येत आहे. त्यामुळे उर्से टोलनाक्यापासून पुढे द्रुतगती महामार्ग आठ पदरी करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. या प्रकल्पासाठी थेट जमीन खरेदी करण्यात येणार असून मोबदल्यापोटी द्यावयाची रक्कम जिल्हा प्रशासनाकडून निश्चित केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्र्यांकडून देण्यात आली.
वाहतूक कोंडीचा प्रश्न दूर होणार
याविषयी माहिती देताना एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्र्यांनी सांगितले की, द्रुतगती महामार्ग आठ पदरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीचा प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी शासनाकडे पाठविला आहे. यामध्ये सुमारे १०० हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर द्रुतगती महामार्गाची क्षमता वाढणार असून वाहतूक कोंडीचा प्रश्न दूर होणार आहे.