पणनमंत्र्यांना भेटून दोन दिवसात मागणी करणार
कराड – कराड बाजार समिती कोणाची जहागिरी नाही. बाजार समितीने जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली आहे. मी सोमवारी मुंबईला जाऊन पणनमंत्र्यांना भेटून ही बाजार समिती बरखास्त करावी, अशी मागणी करणार आहे, असा इशारा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला. आंदोलनाचे चांगले फलित तुम्हाला दोन दिवसांत मिळावे, यासाठी मी प्रार्थना करतो, असेही ते म्हणाले.
कराड येथील बाजार समितीची संरक्षक भिंत पाडून रस्ता व्हावा, यासाठी त्रिशंकू भागातील नागरिकांचे धरणे आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाला माजी मंत्री खोत यांनी भेट दिली. त्याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील सर्व बाजार समित्या बोगस आहेत. दुकाने, गाळे बोगसपणे दिलेली असतात. बाजार समिती म्हणजे चोरांचा मोठा अड्डा आहे. त्या खात्याचा मंत्री असताना भाजीपाला नियमनमुक्तीचा खासगी बाजार समितीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला.
माझा बाजार समितीला पहिल्यापासूनच विरोध आहे. कराडमधील रस्त्याचा प्रश्न एकाचा नाही. हजारो कुटुंबाचा आहे. त्यामुळे बाजार समिती माणुसकी म्हणून विचार करणार आहे की नाही? सरकारी वकिलांचा रिपोर्ट येऊ दे, असे सांगितले जाते. त्यांना दोन पाने वाचायला सात आठ दिवस लागतात. बाजार समिती कोणाची जहागिरी आहे का?
मी सोमवारी मुंबईला जाऊन पणनमंत्र्यांना भेटून बाजार समिती बरखास्त करावी, ही मागणी करणार आहे. बाजार समितीने जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली आहे. या सर्व बाबी सरकारसमोर निश्चितपणे आणून देणार असून, आता आम्ही शांत बसणार नाही. रस्ता मिळाला, तरीही बाजार समितीची चौकशी लावणार आहोत. काही लोकांना दया येत नसेल, प्रश्न समजत नसेल तर नाइलाजाने त्यादिशेने जावे लागेल.