पुसेगाव – पारंपारिक धार्मिक संस्था आणि चालीरीतीनी स्त्रियांच्या गुलामगिरीला प्राधान्य दिले. त्यामुळे स्त्रियांच्या मानसिकतेचे अध:पतन करण्याचे काम रूढी, परंपरा व धर्मसंस्थांनी केले, असे परखड मत प्रा. डॉ. अरुण शिंदे यांनी व्यक्त केले. कामेरी (ता. वाळवा) येथे सावित्री महिला मंडळातर्फे आयोजित वात्सल्य भगिनी व्याख्यानमालेत ते बोलत होते. आमदार सुमनताई पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. प्रारंभी माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व वत्सला पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले.
आमदार सुमनताई पाटील यांच्या हस्ते सावित्री महिला मंडळातर्फे देण्यात येणारा २०२४ चा वात्सल्य पुरस्कार देशातील पहिले फिरते वाचनालय चालविणारे जीवन इंगळे (रा. बुध, जि. सातारा) यांना प्रदान करण्यात आला. माजी आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, समाजसमृद्धीसाठी वाचन आणि व्याख्यान यांची गरज आहे. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून समाजातील महिला पुढे येत आहेत ही चांगली बाब आहे.
पुरस्काराचे मानकरी जीवन इंगळे म्हणाले, घर किती सुंदर आहे, समृद्ध आहे, किती कोटींचे आहे हे पाहण्यापेक्षा त्यामध्ये चांगले विचार पेरणारी प्रेरणादायी पुस्तके असली पाहिजेत तरच आपली मस्तके घडतील. यावेळी इंगळे यांच्या ‘फिरते वाचनालय’ या प्रेरणादायी उपक्रमास कर्मवीर शिक्षण संस्थेच्या वतीने पुस्तके भेट देण्यात आली. पीयूषा सुयोग पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. डॉ. स्मिता पाटील यांनी प्रास्ताविक केले. संतोष जाधव यांनी सूत्रसंचालन केले. अंजली नावलकर यांनी आभार मानले.