सातारा – गोडोली परिसरातील गोडोली तळयानजीक राहणा-या व्यापा-यांचे व रहिवाशांचे पावसामुळे मोठे आर्थिक नुकसान होत असून नगरपालिकेने लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक व्यापाऱ्यांनी पालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या असून नगरपालिकेनेही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती व्यंकटराव मोरे पाटील यांनी दिली.
निवेदनात म्हटले आहे की, गोडोली येथील सर्व्हे नं. ५२ येथे जवळपास ११ एकर क्षेत्र पाण्याचा तलाव होता. अजिंक्यतारा किल्ला परिसरातील पाणी गोडोली येथील काळंबीच्या ओढ्याने प्रवाहित होऊन सर्व्हे नं. ५२ मध्ये असणाया या तलावात जमा होऊन पुढे ओढ्याने एमआयडीसीमार्गे देशमुख वसाहत व वनवासवाडीमार्गे नदी पात्रात जात होते.
२००७- २००८ पासून अजिंक्यतारा किल्ल्यावरून प्रवाहित होणारे पाणी काळंबीच्या ओढ्यात योग्य प्रकारे संग्रहित होत नाही. कारण हा ओढा गाळाने भरला असून काही ठिकाणी पाण्याचा प्रवाहाला नागरिकांकडून बांधकाम करून प्रतिबंधित केले आहे. या काळंबीच्या ओढ्याचे पात्र अरुंद व उथळ झाल्यामुळे गोडोली येथील पायरी प्लाझामधील दुकानगाळे, अक्षता मंगल कार्यालय, विशाल कलर वर्ल्ड, वासुदेव टायर्स, जगताप होंडा, मॅजेस्टी टायर्स, हॉटेल पालव व तेथील शेतात, स्थानिक कुटुंबीयांच्या घरांमध्ये २००७- २००८ पासून प्रचंड प्रमाणात पाणी भरल्यामुळे दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान होसे. अशा प्रकारे पावसामुळे दरवर्षी होणारे नुकसान टाळण्यासाठी ओढा १० ते १२ फूट रुंद करून पाण्याला प्रवाहित होण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने खोलीकरण करावे.
पुलाच्या खालील गाळ काढून त्याचीही रुंदी व खोली वाढवावी अथवा उंची वाढवावी. त्यामुळे पावसाचे पाणी इतरत्र पसरून होणारे नुकसान टाळता येईल. याबाबत उपाय करण्याबाबत मुख्याधिकारी अभिजित बापट व मुख्य अभियंता दिलीप चिद्रे त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम अभियंता प्रशांत खैरमोडे यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळणार असून पाणी भरण्याचे संकट दूर होईल, असा विश्वास व्यंकटराव मोरे पाटील यांनी व्यक्त केला. माजी नगसेवक शेखर मोरे पाटील, रवी पवार, अमृत कैलास चव्हाण, श्रीकांत जाधव आदी उपस्थित होते.