सातारा – राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत कन्याकुमारी येथून काश्मीरपर्यंत धावत निघालेल्या दोन नौसैनिकांचे साताऱ्यात मंगळवारी सकाळी 8 वाजता बॉम्बे रेस्टॉरंट चौकात सातारा रनर्स फौंडेशन, आजी-माजी सैनिक संघटना व मंथन इनोव्हेटिव्ह ग्रुप यांच्यावतीने करण्यात आले.
राजस्थान येथील रामरतन, हरियाणातील संजयकुमार या दोन युवकांनी राष्ट्रीय एकात्मता व तंदुरुस्तीचा संदेश देण्यासाठी कन्याकुमारीतून 11 जानेवारीपासून धावायला सुरुवात केली. एकूण चार हजार 431 किमीचा प्रवास 56 दिवसांत करून ते 8 मार्चला काश्मीरमध्ये पोहोचणार आहेत. हे दोघे 11 राज्ये, 91 मोठी शहरे, एक हजारांपेक्षा अधिक खेड्यांमधून धावत आहेत.
सातारा येथे मंगळवारी सकाळी त्यांचे आगमन झाले. त्यावेळी विविध संघटनांच्या सदस्यांनी बॉम्बे रेस्टॉरंट चौकात त्यांचे स्वागत करून पुढील दौडीसाठी शुभेच्छा दिल्या. सूर्यकांत पडवळ (आप्पा), प्रमोद कणसे, अश्फाक पटेल, राजेंद्र निकम, आजी-माजी नौसैनिक संघटनेचे शंकर माळवदे, रनर्स फाउंडेशनचे डॉ. संदीप काटे उपस्थित होते. सातारकरांनी केलेल्या आदरातिथ्यामुळे दोघे भारावून गेले होते.