नागठाणे – पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सातारा ते कागल या टप्प्याचे सहापदरीकरणाचे काम सध्या जोरात सुरू आहे. परंतू या कामादरम्यान, संबंधित ठेकेदार कंपनीकडून अपघातजन्य स्थळांवर कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने अनेक अपघातांना निमंत्रण मिळत होते. यासंदर्भात दै. प्रभातने “महामार्ग की मृत्यूमार्ग’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करुन सर्व संबंधितांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर त्या वृत्ताची दखल घेत, संबंधित ठेकेदार कंपनीने महामार्गावर अपघात टाळण्यासाठीच्या उपाय योजनांकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे आता महामार्गावर अपघातजन्य ठिकाणांवर काहीशी दिलासादायक स्थिती निर्माण झाली आहे.
सातारा ते पेठनाका या 67 किलोमीटरच्या सहापदरीकरणाचे काम अदानी समुहाने घेतले आहे. तर त्यांनी सब-ठेकेदार म्हणून डी. पी. जैन या कंपनीला काम दिले आहे. साधारण आठ महिन्यांपासून हे काम दिवसरात्र सुरू आहे. ते करताना ठेकेदाराने प्रवाशांच्या सुरक्षेविषयी केलेल्या चुका व त्रुटींवर दि. 10 ऑक्टोबरच्या अंकात महामार्ग की मृत्यमार्ग? या वृत्ताद्वारे प्रकाश टाकला होता. त्यानंतर डी.पी. जैन कंपनीचे व्यवस्थापन जागे झाले असून, प्रवाशांच्या सुरक्षेविषयी उपाययोजना केल्याचे दिसत आहे.
प्रभातमध्ये संबंधित वृत्त प्रसिद्ध झाल्यावर सामाजिक कार्यकर्ते व प्रवाशांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेऊन बोरगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदार कंपनीशी संपर्क साधून सामाजिक कार्यकर्ते, कंपनी प्रतिनिधींची बैठक दि. 12 रोजी बोरगाव पोलीस ठाण्यात आयोजित केली होती. त्यावेळी कंपनीच्या सुरक्षा विभागाचे प्रमुख अजित घारे यांच्यावतीने कादीर अन्सारी उपस्थित होते. चर्चेअंती कंपनीने सर्व उपाययोजना करण्यासाठी आठ दिवसांची मुदत मागितली होती. तसेच आंदोलन न करण्याची विनंतीही केली होती. त्याप्रमाणे सध्या सातारा (वळसे) ते पेरले फाटा या अंतरातील मार्गावर उपाय योजना केल्याचे दिसत आहे.
दरम्यान, वृत्त प्रसिद्घ झाल्यानंतर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, सातारा जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांनीही ठेकेदार डी. पी. जैन कंपनीच्या व्यवस्थापनाला सक्त सुचना केल्या होत्या. तसेच दि. 12 रोजी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे पथकही पाहणीसाठी आले होते. दै. प्रभातच्या वृत्तामुळे ठेकेदार कंपनीने सहापदरीकरणाच्या कामात प्रवाशांच्या सुरक्षेविषयी असलेल्या त्रुटी दूर केल्याने अपघातांच्या संख्येत घट होईल, अशी अपेक्षा आहे. तर ठेकेदार कंपनीला उपाय योजना करण्यास भाग पाडल्याबद्दल दैनंदिन प्रवास करणारे वाहनधारक, प्रवासी व परिसरातील नागरिक दै. प्रभातला धन्यवाद देत आहेत.