कराड – मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक विचार करत आहे; परंतु छगन भुजबळ हे राईचा पर्वत करत आहेत. ते ज्येष्ठ नेते असून, आरक्षणावरून त्यांनी मुक्तातफळे उधळणे थांबवावे, असा इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिला. सत्ता गेल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षणा संदर्भात शहाणपण दाखवू नये, असा टोलाही त्यांनी लागवला.
मुंबईहून कोल्हापूरला जाताना, विखे-पाटील हे कराड येथे एका हॉटेलमध्ये काही वेळ थांबले होते. तेथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर आहे. याबाबत कोणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही. मनोज जरांगे-पाटील यांना आम्ही लेखी आश्वासन दिले आहे. मराठा समाज मागत असलेले आरक्षण, हा त्यांचा अ धिकार आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता, मराठा आरक्षण देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी वारंवार स्पष्ट केले आहे; परंतु भुजबळ हे राईचा पर्वत का करत आहेत, हे समजत नाही. त्यांनी मुक्तफळे उधळणे थांबवावे.
दूधदर आंदोलनाबात विचारले असता, विखे-पाटील म्हणाले, दूधाला प्रतिलिटर किमान 34 रुपये दर दिला पाहिजे. काही दूध संघ सरकारचा आदेश पाळत नसल्याच्या तक्रारी आहेत. महाराष्ट्रात 30 टक्के दुधात भेसळ होत आहे. ही भेसळ तात्काळ थांबवणे गरजेचे आहे. दुधाच्या दराबाबत खासगी दूध संघ ऐकणार नसतील, तर त्यांचे परवाने रद्द करावे लागतील.
सत्ता गेल्यानंतर शहाणपण काय कामाचे
राज्यात आमचे सरकार असते, तर मराठा समाजाला आरक्षण दिले असते, या पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा विखे- पाटील यांनी समाचार घेतला. दुर्दैवाने महाराष्ट्रात झालेली काँग्रेसची पीछेहाट आणि वाताहतीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेच जबाबदार आहेत. त्यांनीच आघाडीचे सरकार घालवले. सत्ता गेल्यानंतर शहाणपण दाखवणे, काय कामाचे, असा सवालही त्यांनी केला.