संतोष पवार
सातारा – राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्या सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीतील बंडाळीमुळे दोन गट निर्माण झाल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरु आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षात अजूनही म्हणावी अशी एकजूट दिसून येत नाही.
त्यामुळे सध्या तरी काँग्रेससह राष्ट्रवादीतील दोन्ही गटात अस्वस्थता दिसून येत आहे. याऊलट भारतीय जनता पक्षाने जिल्ह्यावर मजबूत पकड निर्माण करत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला काबिज करण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. काही दिवसातच लाेकसभेची आचारसंहिता लागणार असल्याने वातावरण तापणार असून आगामी काळात काय घडामोडी होताहेत याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र अजित पवार यांनी समर्थकांसह शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार व अजित पवार असे दोन गट राष्ट्रवादीत पडले आहेत.
सातारा जिल्ह्यातील दिग्गज नेते म्हणून ओळखल्या जाणार्या विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हा राष्ट्रवादीला भगदाड पडले आहे. राष्ट्रवादी एकसंघ असताना सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. सध्याही जिल्ह्यात राष्ट्रवादीचे चांगले वातावरण होते. मात्र पक्षांतर्गत धुसफूस कायम राहिली आहे. आडवा-आडवी, जिरवा-जिरवीच्या राजकारणामुळे राष्ट्रवादीत काही प्रमाणात असंतोष होता. जिल्हा बँक निवडणुकीत त्याची प्रचिती आली. अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. जिल्ह्यात पहिल्यापासून शरद पवार व अजित पवार यांचे स्वतंत्र गट कार्यरत असल्याचे दिसून येते. यातूनच पक्षांतर्गत संघर्ष वाढल्याने बालेकिल्ला धोक्यात आला आहे.
जिल्ह्यातील तीन दिग्गज अजित पवार यांच्या गळाला लागल्याने खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे या तिघांवरच बालेकिल्ला वाचवण्याची जबाबदारी आहे. जिल्हाध्यक्ष सुनील माने व जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी पक्षाला ताकत देण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. धुरंदर राजकारणी म्हणून ओळखल्या जाणार्या रामराजे यांनी एकप्रकारे जिल्ह्यात वर्चस्व प्रस्थापित केले आहे. जिल्हा बँकेवर रामराजे यांचीच मजबूत पकड आहे. फलटण- कोरेगाव मतदारसंघही त्यांनी ताब्यात ठेवला आहे. याशिवाय मतदारसंघातील सहकारी संस्थांवर त्यांचेच अधिराज्य आहे. वाई मतदारसंघात मकरंद पाटील यांचे वर्चस्व असून किसन वीर सहकारी साखर कारखाना, खंडाळा कारखाना व सहकारी संस्थांवर त्यांची मजबूत पकड आहे.
अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाइक निंबाळकर, कार्याध्यक्ष अमित कदम व सरचिटणीस निवास शिंदे यांनी जिल्ह्यात पक्ष बळकटीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. राष्ट्रीय काँग्रेसमध्येही माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण सोडले तर प्रभाव पडेल असे नेतृत्व दिसून येत नाही. मात्र तरीही सातारा जिल्ह्यात काँग्रेसची मजबूत बांधणी करण्याचा प्रयत्न पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, धनश्री महाडीक आदींंना बरोबर घेत त्यांनी रान तापवले आहे. मात्र अद्यापही म्हणावी तशी काँग्रेस एकरुप झालेली नाही. पक्ष संकटात असतानाही पक्षातील कलह अद्याप थांबलेला दिसून येत नाही. याचा फटका पक्षाला बसला आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादीतील दोन गटातील अस्वस्थेचा फायदा उठवत भाजपने जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली आहे. खा. उदयनराजे भोसले , खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हा पिंजून काढला आहे. पक्ष संघटना वाढवून त्यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. केंद्रात व राज्यात असलेल्या सत्तेच्या माध्यमातून विविध योजना गावोगावी पोहोचवल्या जात आहेत. याचबरोबर विविध विकासकामे मार्गी लावली जात आहेत. भाजपने विविध आघाडी, सेलच्या माध्यमातून जोरदार मोर्चेबांधणी केली असून जिल्ह्यावर मजबूत पकड ठेवली आहे.
अजित पवार गटाच्या भूमिकेकडे लक्ष
यापूर्वी जिल्हा भाजप शिवसेना व त्यांच्या विरोधात काँग्रेस व राष्ट्रवादी अशा निवडणुका होत होत्या. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यात घडलेल्या घडामोडींमुळे अनेक चक्रे फिरली आहेत. आगामी निवडणुकीत अजित पवार गटात महायुतीत गेल्यास जिल्ह्यातील चित्र बदललेले दिसणार आहे. भाजप, शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी असे समीकरण झाल्यास शरद पवारांची राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेस यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. या संकटात महाविकास आघाडीने जिल्ह्यात एकत्र येत एकजूट दाखवली असली तरी निवडणुका लागल्यानंतर तशी एकजूट टिकणे आवश्यक आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे.