सातारा – जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तलावांसह विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी कमी झाली असून जिल्ह्यात ६८ गावे २५७ वाड्यांना ६४ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. शेती पिकांना पाणी उपलब्ध नसल्याने गहू, ज्वारीसह इतर पिके धोक्यात आली असून सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने भूजल पातळीत घट होत असल्याने आगामी काळात आणखी टॅंकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
राज्यात जून- जुलैपासून सुरू होणार्या मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडल्याने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परतीचा पाऊसही झाला नसल्याने भूजल पातळीत वाढ झाली नाही. मार्च- एप्रिल महिन्यामध्ये निर्माण होणारी परिस्थिती ऑक्टोबरपासून दिसून येत आहे. शेतीसाठी आवश्यक तेवढे पाणी उपलब्ध नसल्याने रब्बी पिके जगणार कशी असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने आगामी काळात पाणीटंचाईचे संकट आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यातच जिल्ह्यातील काही तालुक्यात दुष्काळाची दाहकता आहे.
जिल्ह्यात सद्य स्थितीत एक लाख १ १२ लोकसंख्येची तहान टँकरच्या माध्यमातून भागविली जात आहे. जिल्ह्यात ६८ हजार १६३ पशुधनाची तहान या पाण्यावर भागत आहे. माण तालुक्यात सर्वाधिक टँकर सुरू असून ३१ गावे,२२० वाड्यांमध्ये ४६ हजार ४९६ नागरिकांना ३६ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. खटाव तालुक्यात ७ गावे ९ वाड्या, फलटण तालुक्यात १० गावे २८ वाड्या, कोरेगाव तालुक्यात १९ गावे, वाइ तालुक्यात एका गावात टंचाइची परिस्थिती निर्माण होत आहे. जिल्ह्यात टंचाई भेडसावणार्या गावांची संख्या 200 हून अधिक असून जानेवारीनंतर पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. भूजल पातळीतही कमालीची घट झाली असून विहिरी व बोअरवेल आटल्या आहेत.
अनेक गावात पाणी टंचाइची समस्या
जिल्ह्यात भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने 106 विहिरींची भूजल तपासणी करण्यात आली असून यामध्ये 56 विहिरींच्या भूजल पातळीत घट झाली आहे. यंदा पाऊस अल्प प्रमाणात झाल्याने जमिनीत पाणी मुरले नसल्याने विहिरी, बोअरवेलचे पाणी कमी झाले आहे. काही ठिकाणी बोअरवेल बंद पडल्या आहेत. यंदा सर्वत्रच पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणातील पाणीसाठे 80 ते 85 टक्क्यांच्या पुढे गेलेच नाहीत. त्यामुळे डिसेंबर महिन्यातच शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक गावांमध्ये सार्वजनिक विहिरी आटल्याने दोन ते तीन दिवसांतून एकदा पाणी सोडले जात आहे.