सातारा – पन्नास पैशाचा कडीपत्ता हे सरकार झालयं बेपत्ता, पंतप्रधान नरेंद्र मोदी हाय-हाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हाय-हाय, या सरकारचे करायचे काय.. अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडत जिल्हाधिकारी कार्यालयावर अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
हा मोर्चा अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा आनंदी अवघडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. मोर्चामध्ये प्रतिभा भोसले, अनिता चव्हाण, मालन गुरव, चंद्रकला शिंदे, सुरेखा शेवाळे, निलोफर मुल्ला, संगीता भुजबळ, साक्षी गायकवाड, संगीता झेंडे, गुलणार अत्तार, उज्वला मुळीक, भारती अहिरेकर, उषा पाटील, सुभद्रा कुंभार, बशीरा सय्यद, छाया पंडित, बिलकीस मुलाणी, चारुशीला जाधव आदी उपस्थित होते.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सेविकांना २६ हजार आणि मदतनीस यांना २० हजार रुपये पगारवाढ देण्यात यावी, वाढत्या महागाईप्रमाणे जर सहा महिन्याला मानधन वाढ देण्यात यावी, सेविका आणि मदतनीस यांना मासिक पेन्शन योजना सुरु करावी, सेविका मदतनीस हे वैधानिक पद असल्याने त्याना शासकीय कर्मचारी करण्यात यावे, प्रा. फंड, पेन्शन, सुविधा लागु करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.