सातारा तालुक्यात उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी
सातारा – लहान वयातच मुलांना पुस्तकाच्या वाचनाच्या अनेक संधी उपलब्ध करून देऊन त्यांच्यामध्ये वाचन कौशल्याचा विकास साधता येतो. वाचनाची आवड लहान वयातच रुजविणे महत्वाचे आहे या हेतूने सातारा तालुक्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत ‘एक तास वाचनासाठी’ या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली. सातारा तालुक्यातील सर्व शाळांमधील 65 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून हा उपक्रम यशस्वी केला आहे.
व्यक्ती उन्नतीला, समाज विकासाला आणि राष्ट्र उत्कर्षाला वाचन आवश्यक आहे. वाचन हे एक महत्त्वाचे मूलभूत कौशल्य असून त्याचा विकास बालकाच्या शालेय जीवनातच होणे आवश्यक आहे. बोलली जाणारी भाषा मुले नैसर्गिक रित्या शिकतात मात्र वाचन हे प्रयत्नपूर्वक शिकावे लागते. सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात व्यक्तीचे वाचन कौशल्य विकसित असणे अत्यंत आवश्यक आहे. सध्याची पिढी ही तंत्रस्नेही असून ई गॅजेटच्या विळख्यात अडकत चाललेली आहे.
या तरुण पिढीला विळख्यातून सोडवण्यासाठी वाचनच महत्वाचे ठरत आहे. लहान वयातच मुलांना पुस्तकाच्या वाचनाच्या अनेक संधी उपलब्ध करून देऊन त्यांच्यामध्ये वाचन कौशल्याचा विकास साधता येतो. वाचनाची आवड लहान वयातच रुजविणे महत्वाचे आहे. या हेतूने सातारा तालुक्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत ‘एक तास वाचनासाठी’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
‘होण्यास सशक्त मस्तक, वाचावे दररोज पुस्तक’ या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांनी दररोज काहीतरी वाचावे, मनातील मरगळ व नैराश्य झटकून टाकण्याची ताकद पुस्तक वाचनामध्ये आहे.‘ग्रंथ हेच गुरु’, पुस्तक हाच सखा आणि सोबती आहे. पुस्तक वाचनाने व्यक्तीला आपल्या जीवनाची दिशा प्राप्त होते.
प्रत्येक विद्यार्थ्यांनी शालेय ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन करावे यासाठी शाळांनी ग्रंथालयातील पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध होण्तासाठी हा उपक्रम आयोजित केला होता. गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांनी अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात भेट देवून उपक्रमाची पाहणी यांनी केली.